ग्रामीण भागात गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, वीज पडल्याने शेतकऱ्याचा आणि गाईचा मृत्यू

खरिपाच्या सुरुवातीला अतिवृष्टी आणि आता गारपीटीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ग्रामीण भागात गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, वीज पडल्याने शेतकऱ्याचा आणि गाईचा मृत्यू
latur news
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 19, 2023 | 11:01 AM

लातूर : लातूर (latur) जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात गारपिटीने शेतकऱ्यांचं (Farmer) मोठं नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर, निलंगा , लातूर ग्रामीण,जळकोट , चाकूर , उदगीर, देवणी आणि अहमदपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस मुसळधार पाऊस झाला आहे. पावसात गारांचा मारा झाल्याने पिके उद्धवस्त झाली आहेत. चाकूर तालुक्यातल्या तीर्थवाडीत शेतकरी नागभूषण पाटील (वय-५७) यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर निलंगा तालुक्यातल्या तांबळवाडी मध्ये वीज पडून गाय ठार झाली आहे. प्रामुख्याने ज्वारी, हरभरा,गहू पिकांबरोबर आंबा फळांचं मोठं नुकसान लातूर (latur unseasonal rain) जिल्ह्यात झाले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कैऱ्या तुटून खाली पडल्याने झाडाखाली ढिग साचला आहे .

लातूर जिल्ह्यातल्या औराद शहाजनी, कासार सिरसी, जाणवळ, हाळी-हंडरगुळी, रामवाडी, खरोळा या गावांसह जळकोट, देवणी तालुक्यातही गारपिटीचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांना घरी खाण्यासाठी लागणारी ज्वारी हातातोंडाशी आली होती. काढणीला आलेली ज्वारी वादळी पाऊस आणि गारपिटीने पूर्णतः आडवी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. हरभरा आणि गहू देखील काढणीला आलेला होता, त्याचेही नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यात केळी आणि ज्वारीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. रेणापूर तालुक्यातल्या रामवाडी येथे आंबा फळांचे नुकसान झाले आहे . कैऱ्या तुटून खाली पडल्याने झाडाखाली ढिग साचला आहे .

पालेभाज्यांची शेतीचे देखील नुकसान झाले

खरिपाच्या सुरुवातीला अतिवृष्टी आणि आता गारपीटीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत . गारपीठ झाल्याचे कळल्या नंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने लातूर गाठत प्रशासनाची बैठक घेतली. तालुकानिहाय माहिती घेतल्या नंतर गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत . शेतकऱ्यांनीही नुकसानही माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सलग दोन दिवस गारपीट झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालेभाज्यांची शेतीचे देखील नुकसान झाले आहे.