Nashik Rain | नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची भीती

| Updated on: Sep 29, 2021 | 12:53 PM

नांदगावची शकांबरी, लेंडी, मन्याड, मनमाड शहरातून वाहणारी पांझन, रामगुळणा मालेगावची गिरणा, मोसम यासह इतर नद्यांना पूर आले असून काहींनी तर रौद्ररूप धारण केल्याचे चित्र आहे. या भागातील अनेक रस्ते, छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे गाव, वाड्या, वस्त्यांचा संपर्क तुटला आहे

Nashik Rain | नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची भीती
नाशिक दुतोंड्या मारुती
Follow us on

नाशिक : नाशिकमधील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणं भरल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. नाशिक शहरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे. रामसेतू ब्रिजपर्यंत पाणी वाढलं आहे. त्यामुळे सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली आहे. दुकानं हटवण्याची धावपळ सुरू आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नाशिक शहराला महापुराचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः हैदोस घातला असून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा भागातील सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नदी-नाल्यांना पूर, घरात पाणी शिरले

नांदगावची शकांबरी, लेंडी, मन्याड, मनमाड शहरातून वाहणारी पांझन, रामगुळणा मालेगावची गिरणा, मोसम यासह इतर नद्यांना पूर आले असून काहींनी तर रौद्ररूप धारण केल्याचे चित्र आहे. या भागातील अनेक रस्ते, छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे गाव, वाड्या, वस्त्यांचा संपर्क तुटला असून शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे शेकडो हेक्टरवरील कांदा, कांद्याचे रोप, मका, बाजरी, भुईमूग, कापूस यासह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून गुलाब वादळाच्या रूपाने आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो नागरिक, शेतकरी संकटात सापडले आहेत पहाटेपासून पाऊस थांबला असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

गंगापूर धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता

गंगापूर धरणातून 5 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर, नाशिकच्या गोदा घाट परिसरात पुन्हा पाणी वाढलं आहे. रामकुंड परिसरात असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागलं असून रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्यात गेली आहेत. संध्याकाळ नंतर आणखी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने, गोदा घाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गंगापूर धरणातून दुपारनंतर 15000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक पाण्याचा विसर्ग आज होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे गोदा घाटच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जनावरं मोकळी सोडा, बांधून ठेवू नका, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पावसामुळे धोका वाढला आहे.

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका

दरम्यान, पुराच्या पाण्यात अडकलेल्या तान्ह्या बाळासह 12 नागरिकांना अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिरजगाव शिवना नदीच्या पाण्यात नागरिक अडकले होते. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य चालू होते.

चाळीसगाव : जुना गाव आणि नवा गावाचा संपर्क तुटला

दोन्ही पुलावरुन तीतूर डोंगरी नदीचे पाणी वाहत आहे. शिवाजी घाट,अण्णाभाऊ साठे नगर, भीमनगर भिल्ल वस्ती, आठवडे बाजारात पाणी शिरलं आहे. त्यामुळे 24 तासांपासून जुना गाव आणि नवा गावाचा संपर्क तुटला आहे.

मनमाड : नांदगांवकर पुन्हा धास्तावले ; शहर पुन्हा जलमय

नांदगांव शहरातील लेंडी नदीला पूर आला. शाकंभरी नदीचेही पाणी वाढू लागले आहे. फरशी पूल, दत्त मंदिर चौक, फुले चौक, गांधी चौकात पाणी शिरले. नागरिकांची सामान आवरण्यासाठी धावपळ उडाली. नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगितलं आहे. नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

जळगावात कुऱ्हा काकोडा गोरक्ष गंगा नदीला पूर

मुक्ताईनगरमध्ये पावसामुळे कुऱ्हा काकोडा गोरक्ष गंगा नदीला पूर आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वन विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कुऱ्हा काकोडा गोरक्ष गंगा नदीला पूर आला असून ग्रामस्थांची पूर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.