पीएम किसान मानधन योजनेला महिला शेतकऱ्यांचा प्रतिसाद, महाराष्ट्रातून किती शेतकऱ्यांची नोंदणी?

| Updated on: Apr 18, 2021 | 11:29 AM

केंद्र सरकारच्या या योजनमध्ये 6 लाख 69 हजार 624 महिला शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. PM kisan maandhan yojana

पीएम किसान मानधन योजनेला महिला शेतकऱ्यांचा प्रतिसाद, महाराष्ट्रातून किती शेतकऱ्यांची नोंदणी?
Jan Dhan Account
Follow us on

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन रुपात दरमहा 3 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारचं या योजनेमध्ये 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचं लक्ष आहे. आतापर्यंत 21 लाख 27 हजार 667 शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे. केंद्र सरकारच्या या योजनमध्ये 6 लाख 69 हजार 624 महिला शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटामधील शेतकरी सहभागी होऊ शकतात. पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाची 60 वर्ष झाल्यानंतर वार्षिक 36 हजार रुपये मिळतील. शेतकऱ्याच्या वयानुसार त्यांना प्रिमियम भरावा लागेल. ही रक्कम 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत आहे. ( PM kisan maandhan yojana six lakh sixty nine thousand women farmers registered)

पहिल्या टप्प्यात 5 कोटी शेतकऱ्यांच्या नोंदणीचं लक्ष

केंद्र सरकारनं पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत एकूण 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 5 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी असेल ते या योजनेसाठी अर्ज करु शकतात. आतापर्यंत या योजनेसाठी 6 लाख 69 हजार 624 महिला शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातील 78 हजार 116 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

पीएम किसान मानधन योजनेसाठी नोंदणी कुठे करायची?

पीएम किसान मानधन योजनेमध्ये एखाद्या शेतकऱ्यानं वयाच्या 18 व्यावर्षी नोंदणी केल्यास त्याला दरमहा 55 रुपये म्हणजेच वार्षिक 660 रुपये भरावे लागतील. तर, 40 व्या वर्षी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा 200 प्रमाणं वार्षिक 2400 रुपये भरावे लागतील. कॉमन सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करु शकतात. नोंदणीसाठी दोन फोटो, बँक पासबूक झेरॉक्स आवश्यक असते. यासाठी कसलेही नोंदणी शुल्क लागत नाही. नोंदणी दरम्यान शेतकरी पेन्शन कार्ड बनवलं जातं.

पीएम किसान मानधन योजना मध्येच सोडल्यास काय?

केंद्र सरकारच्या माहितीनुसार पीएम किसान मानधन योजना मध्येच बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. संबंधित शेतकऱ्याचे पैसे बुडणार नाहीत. शेतकऱ्याला बचत खात्याच्या व्याजदराप्रमाणं व्याज देऊन ती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

पीएम किसान मानधन योजनेविषयी अधिक माहिती

या योजनेतील शेतकऱ्याच्या मृत्य झाल्यास त्याच्या पत्नीला 50 टक्के म्हणजेच 1500 रुपये मिळतील. या योजनेची सुरुवात 9 ऑगस्ट 2019 ला झारखंड येथून करण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसह आणखी दोन योजनांचा मोफत लाभ, वाचा सविस्तर

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून 2000 रुपये जमा होणार, यादीतील तुमचं नाव आजच चेक करा!

( PM kisan maandhan yojana six lakh sixty nine thousand women farmers registered)