Monsoon : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही मान्सूनची हजेरी, खरिपाबाबत बळीराजा आशादायी

| Updated on: Jun 24, 2022 | 4:31 PM

22 जूनपासून राज्यातील पर्जन्यमानात बदल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार झालेला बदल आता मराठवाडा अनुभवत आहे. कारण गेल्या तीन दिवसांपासून या विभागातील बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला आहे. यामुळे लागलीच पेरण्या होणार नाहीत मात्र, पेरणीपूर्वची मशागतीची कामे आटोपून घेता येणार आहेत. आतापर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावलेली होती

Monsoon : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही मान्सूनची हजेरी, खरिपाबाबत बळीराजा आशादायी
मान्सून
Follow us on

पुणे : यंदा (Kharif Season) खरिपाच्या बाबतीत सर्वकाही उशीराने घडताना पाहवयास मिळत आहे. जिथे वेळेपूर्वी (Monsoon) मान्सून हजेरी लावणार होता तिथे आता जूनच्या अंतिम टप्प्यात राज्यात तो सक्रिय झाला आहे. शिवाय बियाणे आणि खताचा पुरवठाही आता कुठे पूर्ण झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीसाठी तयारीत असलेल्या बळीराजाला हातावर-हात ठेवून पावसाची प्रतिक्षा करण्याची नामुष्की ओढावली होती. पण गेल्या दोन दिवसांपासून (Climate Change) वातावरणात तर बदल झाला आहेच शिवाय कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. पावसाची सुरवात हीच मोठी दिलासादायक बाब मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे. कारण गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तो आता बरसत आहे.

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला

22 जूनपासून राज्यातील पर्जन्यमानात बदल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार झालेला बदल आता मराठवाडा अनुभवत आहे. कारण गेल्या तीन दिवसांपासून या विभागातील बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला आहे. यामुळे लागलीच पेरण्या होणार नाहीत मात्र, पेरणीपूर्वची मशागतीची कामे आटोपून घेता येणार आहेत. आतापर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावलेली होती. गुरुवारी मात्र, सर्वदूर पाऊस झाला आहे. यंदा पेरणी कामाला उशीर होत असला तरी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पीक पध्दतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

विभागनिहाय असा राहिला पाऊस

कोकणात हंगामाच्या सुरवातीपासून पावसाने समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये पालघरमध्ये 42 मिमी, रायगडात 42 मिमी, सिंधुदुर्ग – 59 मिमी, ठाणे 55 मिमी तर मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे 36, राहुरीत 42, नाशकातील देवळा येथे 63, इगतपुरीत 42, पुण्यातील वेल्हे 50, सोलापूरातील जेऊर 50, माढा 30, सांगोला 45 तर मराठवाड्यातील औरंगाबादतील गंगापूरात 40, खुलताबाद 53, बीडमधील माजलगावात 51, जालना येथील घनसांगवी 40, जालन्यात 40, परभणीतील धालेगाव 30, गंगाखेड 40, पाथरी 32 असे पावसाचे प्रमाण राहिले आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांना दिलासा मात्र जोरदार पावसाची प्रतिक्षा

सध्याच्या पावसामुळे राज्यात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असला तरी अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. शिवाय त्यामध्ये सातत्य असणेही तेवढेच गरजेचे आहे. आता सर्वदूर पावसाला सुरवात झाली असली तरी पेरणीसाठी 75 ते 100 मिमी पावसाची गरज आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे सुरवात झाली असली तरी अपेक्षित पाऊस झाल्यावरच पेरणी कामांना गती येणार आहे.