Nanded : सोयाबीन दर वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना मोबदला चोरट्यांना, भाव वाढताच शेतीमालावरच डल्ला

| Updated on: Mar 27, 2022 | 10:16 AM

खरीपातील सोयाबीन उत्पादनात घट झाली तरी वाढीव दरातून उत्पन्नात भर पडेल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. गेल्या पाच महिन्यापासून ऊन, वारे आणि अवकाळीपासून सोयाबीनचे संरक्षण केले मात्र, पावडेवाडी येथील शेतकरी चोरट्यांच्या तावडीतून आपल्या शेतीमालाचे संरक्षण करुन शकला नाही. एका रात्रीतून 30 क्विंटल सोयाबीन आणि 10 क्विंटलवर हरभऱ्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

Nanded : सोयाबीन दर वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना मोबदला चोरट्यांना, भाव वाढताच शेतीमालावरच डल्ला
नांदेड जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी चक्क शेतीमालावर डल्ला मारला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड : खरीपातील (Soybean) सोयाबीन उत्पादनात घट झाली तरी वाढीव दरातून उत्पन्नात भर पडेल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. गेल्या पाच महिन्यापासून ऊन, वारे आणि अवकाळीपासून सोयाबीनचे संरक्षण केले मात्र, पावडेवाडी येथील (Farmer) शेतकरी चोरट्यांच्या तावडीतून आपल्या शेतीमालाचे संरक्षण करुन शकला नाही. एका रात्रीतून 30 क्विंटल सोयाबीन आणि 10 क्विंटलवर (Soybean Theft) हरभऱ्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यामध्ये शेतकरी माधव पावडे यांचा अडीच लाखाचा शेतीमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. नैसर्गिक संकटावर मात करुन शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले पण चोरट्यांच्या तावडीतून शेतीमालाचे संरक्षण करु शकला नाही. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशीच परस्थिती पावडे यांच्यावर ओढावली आहे.

शेतामध्येच शेतीमालाची साठवणूक

अवकाळी आणि खरिपातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्याने गेल्या पाच महिन्यापासून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. शेतकऱ्यांचा अंदाज खरा ठरला आणि 6 हजारावरील सोयाबीन आता 7 हजार 300 वर पोहचले आहे. माधव पावडे यांनी शेतामध्येच सोयाबीन आणि हरभऱ्याची साठवणूक केली होती. आता दरवाढ झाल्याने सोयाबीन आणि हरभऱ्याची ते विक्री करणार तेवढ्यात चोरट्यांनीच या शेतीमालावर डल्ला मारला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.

पंचनामा झाला न्याय मिळण्याची अपेक्षा

सोयाबीनचा भाव 10 हजार रुपयावर जाईल या आशेवर पावडे यांनी सोयाबीन आखाड्यावर साठवून ठेवले होते. आखाड्यावर साठवून ठेवलेल्या या सोयाबीन आणि हरभऱ्याच्या पोत्यावर रात्री चोरट्यानी डल्ला मारला.सकाळी पावडे हे शेताकडे गेले असता हा चोरीचा प्रकार पावडे यांच्या लक्षात आला.या चोरीच्या घटनेचे माहिती भाग्यनगर पोलिसांना देण्यात आली,पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सध्या या सोयाबीन चोरणाऱ्या चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

वर्षभराची मेहनत अन् अडीच लाखाचे नुकसान

माधव पावडे यांनी वर्षभर मेहनत करुन सोयाबीन आणि आता रब्बी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन घेतले होते. उत्पादनावरील खर्च शिवाय काढणीसाठीची मजूरी यामुळे त्यांचा अधिकचा खर्च झाला आहे. चोरट्यांनी थेट शेतीमालच चोरल्याने माधव पावडे यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. शिवाय यामधून त्यांना अडीच लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते पण एका रात्रीतून सर्वकाही होत्याचे नव्हते झाले आहे.

संबंधित बातम्या :

Nanded : तोडणीअभावी सर्वात मोठ्या नगदी पिकाचे नुकसान, हंगाम अंतिम टप्प्यात तरीही ऊस फडात

Orchard Cultivation: पारंपरिक पिकांना डावलून फळबाग क्षेत्रात वाढ,योजनांचा लाभ उत्पादनात वाढ अन्

दिल्ली हे Smart Farming चे देशातील पहिले राज्य..! स्मार्ट फार्मिंगचा नेमका फायदा काय?