यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल (UPSC 2021 Final Result) जाहीर झाला आहे. यंदा या परीक्षेत 685 उमेदवार पात्र ठरले आहेत. या उमेदवारांपैकी काही उमेदवार आपल्याला फक्त यूपीएससी काय तर आयुष्यात प्रेरणादायी (Inspirational) ठरू शकतील असे आहेत. एकाने भ्रष्टाचाऱ्याचं प्रकरण उघडकीस आणताना सात वेळा गोळ्या खाल्ल्या, एक अंध असून सुद्धा त्याच्या स्वप्नांना समस्या नाही तर समस्यांना स्वप्न सांगतो, तेही दम देऊन! एकाचे वडील शिक्षक, एकाचे पोलीस अशी सामान्य कुटुंबातली ही असामान्य मुलं आज यूपीएससी देऊन अधिकारी (UPSC Aspirants) झाली आहेत. हे सगळं फक्त अथक आणि सततच्या प्रयत्नांमुळे! स्वप्नांना माणूस कुठला, काय परिस्थितीतील, किती सामान्य हे कळत नाही. स्वप्नांना फक्त आणि फक्त धाडस, मेहनत आणि सातत्य लागतं. बघुयात अशाच काही “यशवंत” मुलांच्या यशोगाथा!
दिल्ली: दिल्लीतील रोहिणी भागात राहणाऱ्या सम्यक एस जैन या विद्यार्थ्याने या परीक्षेत 7 वा क्रमांक मिळवला आहे. मात्र, सम्यकची निवड वेगळी का आहे, त्याचं यश थोडंसं हटके का आहे तर लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे तो दृष्टिहीन आहे, असं असूनही त्याने यूपीएससीसारखी खडतर परीक्षा दुसऱ्याच प्रयत्नात उत्तीर्ण केलीये. सम्यकने सांगितले की,निकाल पाहून मला खूप आनंद झाला.आपला रँक सिंगल डिजिटमध्ये येईल याची कल्पनाही केली नव्हती. इंग्रजी ऑनर्समध्ये पदवी, पदवीनंतर त्यानी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून (आयआयएमसी) इंग्रजी पत्रकारितेचा डिप्लोमा, त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात एम.ए.ची पदवी आणि आता यूपीएससी उत्तीर्ण असा सम्यकचा प्रवास आश्चर्यकारक आहे. सम्यकने 2020 साली पहिल्यांदा यूपीएससी दिली होती, ज्यामध्ये तो अपयशी ठरला. मात्र, त्याने कष्ट करणे थांबवले नाही आणि सततच्या प्रयत्नांमुळे तो दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला.इतकंच काय तर दुसऱ्याच प्रयत्नांत त्याने एकअंकी रँकही मिळवला आहे. सम्यकने डिजिटल स्वरूपातील पुस्तकं मिळवून अभ्यास केला आणि यश मिळवलं.
भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकीस आणल्यानंतर सात गोळ्या झाडण्यात आलेल्या एका अधिकाऱ्याने नागरी सेवा किंवा यूपीएससी 2021 (संघ लोकसेवा आयोग) परीक्षा उत्तीर्ण केलीये. रिंकू सिंग राही या परीक्षेत 683 व्या स्थानावर आहे आणि त्याला खूप आनंद झाला आहे, कारण हा रिंकू सिंग राहीचा शेवटचा प्रयत्न होता. रिंकू राही हे उत्तर प्रदेशातील हापूर येथील प्रांतीय नागरी सेवा अधिकारी आहेत. 2008 मध्ये मुझफ्फरनगरमधील शिष्यवृत्तीत 83 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. राज्याच्या समाजकल्याण विभागात ते अधिकारी आहेत. रिंकू यांच्याकडे घोटाळ्यासंबंधित पुरावे असल्याने त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांनी केलेल्या या कारवाईनंतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि चार जणांना 10 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्या चेहऱ्यावरही गोळी झाडण्यात आली होती; त्याचा चेहरा विद्रूप झाला होता आणि त्याची दृष्टी आणि श्रवणशक्तीही हरवली होती. रिंकू सिंग राही एका सरकारी आयएएस कोचिंग सेंटरचे संचालक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि या परीक्षेत 683 व रँक घेतला. याआधी २००४ मध्ये ते प्रांतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.
पहिल्यांदाच पोलीस कमिश्नरचा मुलगा यूपीएससीमध्ये रँक मिळवून उत्तीर्ण झालेला आहे. चेतन पंदेरे असं या मुलाचं नाव आहे आणि तो रत्नागिरीचा रहिवासी आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमधून केमिकल इंजिनिअरिंग करून चेतनने चार वर्ष सातत्याने मेहनत केली. त्या मेहनतीचं फळ आज त्याला यूपीएससी 2021 च्या अंतिम निकालात रँक मध्ये येऊन मिळालं आहे. रँकनुसार चेतनला आयपीएस सेवेत काम करण्याची संधी मिळणार आहे. एका पोलिसाचा मुलगा असल्याने त्याच क्षेत्रातील उच्च पदावर काम करायला मिळत असल्याने पंदेरे कुटुंबीय आनंदात आहे. त्याने त्याचा मार्ग निवडून चांगल्या निकालासाठी प्रसंगी लागेल तेवढी मेहनत केली आणि आज त्याला ते यश मिळालं असं मत चेतन पंदेरेच्या वडिलांनी व्यक्त केलंय.
लातूर: लातूरच्या किल्लारीमधील शुभम संजय भोसले याने 149 वी रँक मिळवून घवघवीत यश मिळवलंय. बी. टेकला असतानाच स्पर्धा परीक्षेतून करिअर करण्याचा निश्चय शुभमचा होता. जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले त्याचे वडील संजय भोसले यांनीही शुभमला प्रोत्साहन दिले. मूळचा किल्लारीचा असलेल्या शुभमचे प्राथमिक शिक्षण औसा येथील मुक्तेश्वर विद्यालयात झाले.आठवी ते दहावी प्रकाशनगर येथील सरस्वती विद्यालयात झाले असून, अकरावी व बारावीचे शिक्षण दयानंद विज्ञान महाविद्यालयात पूर्ण केले. त्याने मुंबईच्या एस.पी कॉलेजमधून बी.टेकचे शिक्षण पूर्ण केलंय. पदवी परीक्षेचे शिक्षण घेतानाच शुभमने तयारी केली अन दुसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला आहे.
सातारा : साताऱ्यातील जावळी तालुक्यातील ओंकार पवारने यूपीएससी परीक्षेत नाकावर टिच्चून यश मिळवलं आहे. नाकावर टिच्चून असं का तर तो मागील वर्षी यूपीएससी परीक्षेत 455 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर तो आयपीएस पदावर सध्या रुजू आहे. पण तरीही त्याने आयएएस व्हायचं ध्येय सोडलं नाही आणि प्रयत्न करत राहिला. जिल्हा परिषदेत शिक्षण झालेल्या या मुलाने गेल्या दोन वर्षात ओंकारने गावात राहूनच यूपीएससीची सर्व तयारी केली आहे. ओंकारचे आई-वडील शेती करतात. तो घरातील पहिला अधिकारी आहे त्यामुळे घरात, गावात सध्या उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. ओंकारने देशात 194 वा क्रमांक पटकवलाय.