इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या, ऐन स्वातंत्र्यदिनी भररस्त्यातील प्रकार

घटनेच्या वेळी दोघांच्याही आसपास अनेक जण होते, हल्ला होताना त्यांच्यापैकी काही जण बघतही होते, मात्र विद्यार्थिनीचा जीव वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नसल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतं.

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या, ऐन स्वातंत्र्यदिनी भररस्त्यातील प्रकार
हैदराबादमध्ये विद्यार्थिनीची हत्या
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 16, 2021 | 8:54 AM

हैदराबाद : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना ऐन स्वातंत्र्यदिनी समोर आली आहे. वादावादीनंतर तरुणाने चाकू हल्ला करत विद्यार्थिनीची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

गुंटूर शहरातील परामयाकुंठा भागातील काकानी रोड परिसरात स्वातंत्र्यदिनी म्हणजेच रविवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या करुन आरोपी पसार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

नेमकं काय घडलं?

आरोपी आणि विद्यार्थिनी काकानी रोड परिसरात एकमेकांशी बोलत होते. यावेळी काही कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या युवकाने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तरुणीच्या पोट आणि गळ्यावर चाकूचे सहा वार करण्यात आले आहेत.

केवळ बघ्याची भूमिका

घटनेच्या वेळी दोघांच्याही आसपास अनेक जण होते, हल्ला होताना त्यांच्यापैकी काही जण बघतही होते, मात्र विद्यार्थिनीचा जीव वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नसल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतं. अखेरीस काही जणांनी हिंमत दाखवली, तोपर्यंत आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. परंतु त्याला पकडण्यासाठीही कोणीच प्रयत्न केले नसल्याचं दिसतं.

पोलिसांनी विद्यार्थिनीचा मृतदेह खासगी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची धरपकड करण्यात आली असून तरुणीच्या फोनमधून काही पुरावे हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मध्य प्रदेशात विवाहित प्रियकराने एक्स गर्लफ्रेण्डचा गळा चिरला

दुसरीकडे, एक्स गर्लफ्रेण्डने फोन उचलणं बंद केल्याच्या रागातून विवाहित तरुणाने तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. लग्नानंतरही तरुणाला आपल्या आधीच्या प्रेयसीसोबत मैत्री कायम ठेवायची होती, मात्र तिने संबंध तोडल्याने तरुणाचा संताप झाला. अखेर त्याने गळा चिरुन तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशात ही घटना घडली.

संबंधित बातम्या :

बहीण-आईच्या मदतीने ‘बारावी टॉपर’ गर्लफ्रेण्डची हत्या, तरुणाला फाशी

दुर्लक्ष केल्याचा राग, विवाहित तरुणाने एक्स गर्लफ्रेण्डचा गळा चिरला

Follow Us