तब्बल 300 वर्ष जुनी श्रीकृष्णाची अत्यंत दुर्मिळ मूर्ती चोरीला! औरंगाबादेत खळबळ

जांब समर्थ यांची मूर्ती चोरी होऊन आता दोन महिने होतील, चोरांचा पत्ता काही लागला नाही. अशातच आणखी एक प्राचीन मूर्ती चोरीला गेल्यानं खळबळ

तब्बल 300 वर्ष जुनी श्रीकृष्णाची अत्यंत दुर्मिळ मूर्ती चोरीला! औरंगाबादेत खळबळ
औरंगाबादेत मूर्तीची चोरी
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 07, 2022 | 1:06 PM

दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद : जालन्यात (Jalana) जांब समर्थ येथील मूर्ती चोरीला गेली. तिचा अजूनही शोध लागलेला नाही. अशातच औरंगाबादमधून (Aurangabad) आणखी दुर्मिळ मूर्ती चोरीला गेल्यानं खळबळ माजलीय. औरंगाबादच्या शेंदूरवाडा गावात चोरीची घटना घडलीय. या गावात असलेल्या संत मध्वनाथ महाराज मठातून श्रीकृष्णाची (Lord Shri Krishna) तब्बल 300 वर्षांपूर्वीची अत्यंत दुर्मिळ मूर्ती चोरीला गेलीय. गुरुवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली.

मराठवाड्यात मंदिरातून दुर्मिळ मूर्ती चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी जालना येथे जाम समर्थ येथील मूर्ती चोरीला गेल्यानं खळबळ उडाली होती. या चोरीप्रकरणी पोलिसांकडून अजूनही तपास केला जातोय. मात्र अजूनही या मूर्तीचा कोणताही ठावठिकाणा लागू शकलेला नाही. अशातच आता शेंदूरवादा इथल्या मध्वनाथ महाराजांच्या मठाकून दुसरी अजून एक मूर्ती चोरीला गेलीय. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलीय.

मध्वनाथ महाराजांचा मठ हा औरंगाबाद जिल्ह्यातील अत्यंत पुरातन मठ आहे. या मंदिरात गेल्या 300 वर्षांपासून श्रीकृष्णाची मूर्ती होती. अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेली ही मूर्ती चोरीला गेलीय. त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसलाय.

ऑगस्ट महिन्यात जालन्यातील घनसावंगी तालुक्यात जांब समर्थ या रामदास स्वामी यांच्या मूळ गावी चोरीची घटना घडली होती. रामदास स्वामी त्यांच्या घरामध्ये ज्या मूर्तींची पूजा करायचे, तीच मूर्ती चोरट्यांनी पळवली होती. पहाटे झालेल्या या चोरीच्या घटनेनंतर अजूनही या चोरीप्रकरणी चोरट्यांचा शोध लाहू शकलेला नाही. अशातच आता औरंगाबादेतही 300 वर्ष जुनी मूर्ती चोरीला गेल्यानं खळबळ उडालीये.

शोध सुरु!

एकीकडे जालन्यातील मूर्तीचोरी प्रकरणाचा तपास सुरु असतानाच आता औरंगाबादमधील मूर्ती चोरीचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. आसपासच्या लोकांची चौकशी करुन, सीसीटीव्ही आणि अन्य खबऱ्यांच्या मदतीने मूर्ती चोरणाऱ्यांना शोध घेतला जाईल. या चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना आता नेमकं केव्हा यश येतं, हे पाहणं महत्त्वाचंय.