300 किलोची ऐतिहासिक तोफ, सशस्त्र दल तैनात, 20 दिवसांनंतरही शोध लागेना

| Updated on: May 26, 2023 | 9:56 PM

पंजाब सशस्त्र पोलिसांच्या 18 व्या बटालियनचे मुख्यालय सेक्टर 1 मध्ये आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस यांच्या येथे ये जा असते. मुख्यालयाच्या मुख्य गेटवर दोन सेन्ट्री पोस्ट आहेत. जिथे सशस्त्र पोलीस 24 तास रात्रंदिवस तैनात असतात.

300 किलोची ऐतिहासिक तोफ, सशस्त्र दल तैनात, 20 दिवसांनंतरही शोध लागेना
PUNJAB POLICE FORCE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

चंदीगड : चंदीगडचे सर्वात पॉश आणि व्हीव्हीआयपी क्षेत्र असलेल्या पंजाब सशस्त्र पोलिसांच्या मुख्यालयातूनच पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटयांनी ऐतिहासिक ऐवज चोरला. पंजाब सशस्त्र पोलिसांच्या मुख्यालयाची शान वाढवण्यासाठी पोलिसांनी तिथे हेरिटेज क्लासची तोफ ठेवली होती. हीच तोफ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या चोरीला 20 दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांना त्या तोफेचा शोध घेता आला नाही. चोरीची ही खळबळजनक घटना चंदिगडच्या सेक्टर 1 मध्ये घडली आहे.

पंजाब सशस्त्र पोलिसांच्या 18 व्या बटालियनचे मुख्यालय सेक्टर 1 मध्ये आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस यांच्या येथे ये जा असते. मुख्यालयाच्या मुख्य गेटवर दोन सेन्ट्री पोस्ट आहेत. जिथे सशस्त्र पोलीस 24 तास रात्रंदिवस तैनात असतात. तर, मुख्यालयाच्या आतमध्ये हजारो पोलीस असतात.

हे सुद्धा वाचा

पोलीस मुख्यालयाबाहेर असा कडेकोट बंदोबस्त असतानाही 300 किलो वजनाची हेरिटेज तोफ चोरीला गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याप्रकरणी पोलीस विभागाने मौन बाळगले असून कुणीही पोलिस अधिकारीही याबाबत बोलायला तयार नाही

पंजाब सशस्त्र पोलिसांसाठी ती तोफ महत्त्वाचा वारसा होती. दीड वर्षांपूर्वी 82 बटालियनच्या स्टोअर रूममध्ये तिला ठेवण्यात आले होते. मात्र, तेथून बाहेर काढून त्या तोफेला बटालियनच्या मुख्य गेटवर ठेवण्यात आले होते.

6 मे च्या मध्यरात्री ही ऐतिहासिक पितळी तोफ चोरट्यांनी चोरून नेली. चोरीच्या पाच दिवसांनंतर 82 बटालियनचे कमांडंट बलविंदर सिंग यांना या घटनेची माहिती मिळाली. यानंतर चंदीगड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

चंदीगड पोलिसांनी याप्रकरणी आयपीसीच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बटालियन मुख्यालयाभोवती बसवण्यात आलेल्या सीसीटी कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांकडून तपासले जात असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे 82 बटालियनमध्ये तैनात असलेल्या जवानांवर पंजाबचे मुख्यमंत्री आणि इतर व्हीआयपी यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यामुळे या घटनेनंतर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.