नाशिकमध्ये बस अपघातानंतर 10 जण आगीत होरपळले! मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर

| Updated on: Oct 08, 2022 | 9:50 AM

नाशिकमध्ये भीषण दुर्घटना, यवतमाळ-मुंबई चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसचा अपघात, अपघातानंतर बसमध्ये अग्नितांडव, 10 ते 12 जण जिवंत जळाले

नाशिकमध्ये बस अपघातानंतर 10 जण आगीत होरपळले! मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर
मृतांच्या ननातलगांना 5 लाखांची मदत जाहीर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक : नाशिकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर (Nashik Bus Accident) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मदतीची घोषणा केलीय. अपघातामध्ये मृत्यू (Nashik Bus Burn Alive) झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. तर जखमींना तातडीने चांगल्यातले चांगले उपचार दिले जावेत, असे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना एकनाथ शिंदे याबाबतची माहिती दिली.

प्राथमिक माहितीनुसार 10 ते 12 प्रवाशी आगीत जिवंत होरपळले असल्याची माहिती मिळाली आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं. आता महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत. त्यांच्याशी मी स्वतः बोललो असल्याचंही शिंदे यांनी यावेळी म्हटलंय. ही घटना दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले.

5 मिनिटांत मदत पोहोचली?

या भीषण अपघातानंतर फायर ब्रिगेट यायला उशीर झाला, असा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केलाय. त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणांना विचारणा केली. पाच मिनिटांत फायर ब्रिगेडची गाडी अपघातस्थळी दाखल झाली, अशी माहिती यंत्रणांकडून मिळाली, असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

खासगी रुग्णालयांचीही मदत घ्या- मुख्यमंत्री

सध्या जखमींनी नाशिकच्या शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नाशिकमध्ये अपघातानंतर बसमध्ये आग लागल्यामुळे मोठा अनर्थ घडला. 10-12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी भाजले गेले असल्याचीही भीती व्यक्त करण्यात आलीय. गरज लागली तर जखमींना चांगल्यातले चांगले उपचार मिळण्यासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत घ्या, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

‘चौकशी होणार’

नाशिकमध्ये झालेल्या भीषण अपघाताची चौकशीही केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. अपघातात चूक कोणाची होती, याची सखोल चौकशी होईल. तसंच मदत पोहोचायला उशीर झाला का, याचाही तपास केला जाईल. चौकशीअंती दोषींवर कारवाईही करु, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठी सोबत बोलताना नमूद केलं.

अपघात का झाला?

यवतमाळच्या पुसदहून मुंबईला येण्याासाठी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस निघाली होती. या बसचा पहाटे पावणे पाच चे पाचच्या दरम्यान, एक आयशर टेम्पो आणि लक्झरी बस यांच्या अपघात झाला. या अपघातानंतर खासगी बसमध्ये आग लागली. या आगीत अनेक प्रवासी होरपळले. तर बसही जळून खाक झाली. आगीत जिवंत जळालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचं आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे.

बसमधील सामान, प्रवाशांची माहिती, ओळकपत्र यांच्यामदतीने मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. या लक्झरी बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते, असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ हा भीषण अपघात घडला. ज्या ठिकाणी अपघात झाला, ते ठिकाणी एक्सिडंट स्पॉट म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि अपघात रोखण्यासाठी अन्य उपाययोजना करण्याची गरज आता व्यक्त होते आहे.