Palghar drown : दुर्दैवी! पोहोण्यासाठी गेलेल्या आठवीतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

| Updated on: Sep 14, 2022 | 7:36 AM

Palghar Drown News : पोहोण्यासाठी गेलेला कल्पिक बराच वेळ घरी परतला नाही म्हणून शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी कल्पिक पाण्यात बुडाला आहे, ही बाब उघडकीस आली. याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.

Palghar drown : दुर्दैवी! पोहोण्यासाठी गेलेल्या आठवीतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
पालघरमध्ये बुडून मृत्यू
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पालघर : पालघरच्या सफाळे पूर्व (Safale East) भागात एक दुर्दैवी घटना घडली. पोहोण्यासाठी गेलेल्या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू (Student drowned) झाला. बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव कल्पिक पाटील (Kalpik Patil) असं आहे. तो विराथन बुद्रुक येथील रहिवासी होता, अशी माहिती समोर आली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने कल्पिकचा बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज बांधला जातोय.

सफाळे पूर्व भागात जंगली डॅम इथं कल्पिक पोहण्यासाठी गेला होता. पोहोण्याच्या उद्देशाने पाण्यात उतरलेला कल्पिक जिवंत परतलाच नाही. कल्पिकचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कल्पिक पाटील या आठवीतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणाची पोलिसांनीही नोंद केली आहे. सफाळे पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांकडून करण्यात आली आहे.

पोहोण्यासाठी गेलेला कल्पिक बराच वेळ घरी परतला नाही म्हणून शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी कल्पिक पाण्यात बुडाला आहे, ही बाब उघडकीस आली. याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी दाखल होत कल्पिक पाटील या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी

आठवीतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी सफाळेमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. दुसरीकडे कल्पिक पाटील याच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह पाहून केलेला आक्रोशही काळीज पिळवटून टाकणारा होता.

पालघरमध्ये गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्या, नाले, ओढे दुथडी भरुन वाहू लागले आहेत. अशातच अनेकांना पाण्यात उतरुन पोहण्याचा आणि अंघोळीचा मोह आवरणं जड जातंय. मात्र पाण्यात उतरण्याचा फाजील आत्मविश्वास जीवघेणा ठरु शकतो, हे अधोरेखित करणाऱ्या घटना वारंवार समोर येत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.

अकोल्यात मंगळवारी आजोबा आणि नातू नदीच्या प्रवाही पाण्यात वाहून गेले होते. या दुर्दैवी घटनेत वाहून गेलेला एकुलता एक नातू अजूनही बेपत्ता आहे. तर आजोबांचा मृतदेह हाती लागलाय. अकोल्यातील ही घटना ताजी असतानाच आता इकडे पालघरमध्ये शालेय विद्यार्थ्याचा बुडून झाल्याची बातमी अनेकांच्या मनाला चटका लावून गेलीय.