केतन तन्ना-सोनू जालानची खंडणी प्रकरणात तक्रार, परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा
परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त असताना 2018 मध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केतन तन्ना आणि सोनू जालान यांना सट्टेबाजी प्रकरणी अटक केली होती.
ठाणे : आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी तसेच त्यांना धमकावून जवळपास पाच कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यासह 28 जणांविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचे निकटवर्तीय कंत्राटदार विकास दाभाडे आणि ख्वाजा युनिस प्रकरणात आरोपी असलेल्या सुनील देसाई यांचीही नावे आहेत. विकास दाभाडे आणि सुनील देसाई यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र दाभाडे यांच्या वकिलांनी अचानक अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला. तर, सुनील देसाई यांना ठाणे न्यायालयाने अंतरिम संरक्षण नाकारले आहे.
काय आहे प्रकरण?
परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त असताना 2018 मध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केतन तन्ना आणि सोनू जालान यांना सट्टेबाजी प्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात मोक्का अंतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन सुमारे पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप केतन तन्ना आणि सोनू जालान यांनी केला आहे.
केतन तन्ना यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये परमबीर सिंह, तत्कालीन गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त दीपक देवराज, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, तर काही खासगी व्यक्ती अशा 28 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विकास दाभाडे आणि सुनील देसाई यांचीही नावे आहेत.
दरम्यान, या प्रकरणातून दिलासा मिळावा यासाठी विकास दाभाडे आणि सुनील देसाई यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर काल निर्णय घेण्यात आला. केतन तन्ना यांच्याकडून वकील सागर कदम आणि पंकज कवळे यांनी बाजू मांडली. विकास दाभाडे यांच्या वकिलांनी सकाळी जामिनासाठी केलेला अर्ज अचानक मागे घेतला. तर, सुनील देसाई यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीत त्यांचे अंतरिम संरक्षण नाकारण्यात आले आहे. यामुळे आरोपींना केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती केतन तन्ना यांचे वकील वकील सागर कदम यांनी दिली.
तसेच केतन तन्ना यांच्यासह असलेल्या फिर्यादींना प्रकरण मिटवण्यासाठी सारखे फोन येत असून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे फिर्यादींना पोलीस संरक्षण देण्याची विनंती ठाणे न्यायालयात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील 28 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करत सर्वांची ईडी मार्फत देखील चौकशी करण्याची मागणी फिर्यादींकडून केली गेली असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
‘कारवाई टाळायची असेल तर पैसे दे’, परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल
मुंबई-ठाण्यात खंडणीचा गुन्हा, परमबीर सिंह यांच्या पाच निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली
Parambir Singh | परमबीर सिंह यांच्यावरील गुन्ह्याच्या तपासासाठी SIT ची नेमणूक