कॅबिनेट मंत्री असताना राणेंना अटक होऊ शकते का? काय होणार, नाशिकचे पोलीस आयुक्तांचं सविस्तर स्पष्टीकरण

| Updated on: Aug 24, 2021 | 11:12 AM

गुन्ह्याचं गांभीर्य पाहून माननीय साहेबांना पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अटकेसाठी पथक रवाना झालं आहे. आदेश अटकेचे दिले आहेत. अटक करणे हा महत्त्वाचा भाग नाही, पुनरावृत्ती होऊ नये हे महत्त्वाचं आहे, असं नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले

कॅबिनेट मंत्री असताना राणेंना अटक होऊ शकते का? काय होणार, नाशिकचे पोलीस आयुक्तांचं सविस्तर स्पष्टीकरण
Follow us on

नाशिक : विविध कलमांतर्गत नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रार आली. तक्रारदारांची भावना दुखावल्याचं नमूद आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करुन न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल, असं स्पष्टीकरण नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलं आहे.

काय असेल प्रक्रिया?

नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांना अटकेनंतर माहिती दिली जाईल. संबंधित जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी त्यांना माहिती दिली जाईल. राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांनाच संविधानात क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना मुभा नाही. या केसमध्ये फॅक्ट ऑफ द केस पाहून ही कारवाई करण्यात येत आहे, असंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

गुन्ह्याचं गांभीर्य पाहून माननीय साहेबांना पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अटकेसाठी पथक रवाना झालं आहे. आदेश अटकेचे दिले आहेत. अटक करणे हा महत्त्वाचा भाग नाही, पुनरावृत्ती होऊ नये हे महत्त्वाचं आहे. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं, असंही दीपक पांडे म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

संबंधित बातम्या :

मी नॉर्मल माणूस वाटलो काय? आमचं पण वरती सरकार, बघतोच : नारायण राणे

 नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचं कार्यलय फोडलं, सांगलीत राणेंच्या पोस्टरवर शाईफेक

नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, भाजपने ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं