बालविवाह, पण तारुण्यात दुसऱ्यावर जीव जडला, तिच्यासोबत जे घडलं ते मन हेलावणारं

मुलीचा बालपणीच विवाह झाला होता. पण मुलगी सासरी जायला तयार नव्हती. तसेच सतत फोनवर दुसऱ्या तरुणाशी बोलायची. आईने खूप समजावले पण ऐकत नव्हती.

बालविवाह, पण तारुण्यात दुसऱ्यावर जीव जडला, तिच्यासोबत जे घडलं ते मन हेलावणारं
कौटुंबिक वादातून पुतण्याने चौघांना संपवले
Image Credit source: TV9 Network
| Updated on: May 04, 2023 | 11:35 PM

अजमेर : मुलगी फोनवर एका तरुणाशी बोलायची म्हणून आई आणि भावाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला होता. अनेकदा समजावूनही मुलगी फोनवर बोलणे बंद करत नव्हती. यामुळे संतापलेल्या आईने भावाच्या मदतीने तिला संपवले. मन हेलावणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. शांती बेगम आणि हनिफ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

मुलीची हत्या केल्यानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार दिली

तरुणीच्या कुटुंबीयांनी 26 एप्रिल रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी नातेवाईकांच्या तक्रारीनंतर फिर्याद नोंद करत तपास सुरु केला. यानंतर 29 एप्रिल रोजी मुलीचा मृतदेह आढळला. नातेवाईकांनी तरुणीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याचीही शंका व्यक्त केली होती. पोलिसांनी जेव्हा हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा पोलिसांना घरच्यांवर संशय आला.

चौकशीत आई आणि भावावर संशय आला

पोलिसांनी नातेवाईकांचीही चौकशी सुरु केली. चौकशीत मुलीचा भाऊ आणि आई दोघांच्या जबाबात तफावत होती. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आईची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. मुलीचा बालपणीच विवाह झाला होता. मात्र ती सासरी जाण्यास तयार नव्हती. मुलगी दुसऱ्या तरुणासोबत फोनवर बोलायची. तिला अनेकदा समजावले मात्र ती ऐकत नव्हती. यामुळे तिची हत्या केल्याची कबुली आईने दिली.