चिमुकले शेततळ्याजवळ खेळत होते, खेळता-खेळता पाण्यात गेले, तिघांचा दुर्देवी अंत, अहमदनगर हळहळलं

| Updated on: Sep 20, 2021 | 6:50 PM

अहमदनगर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना समोर आली आहे. शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चिमुकले शेततळ्याजवळ खेळत होते, खेळता-खेळता पाण्यात गेले, तिघांचा दुर्देवी अंत, अहमदनगर हळहळलं
चिमुकले शेततळ्याजवळ खेळत होते, खेळता-खेळता पाण्यात गेले, तिघांचा दुर्देवी अंत, अहमदनगर हळहळलं
Follow us on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना समोर आली आहे. तीन चिमुकले शेततळ्याजवळ खेळत होते. खेळता-खेळता ते शेततळ्यातलं पाणी पाहू लागले. यावेळी तीनही चिमुकले पाण्याजवळ गेले. त्यांचा पाय घसरुन ते शेततळ्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने दुर्देवाची घटना घडली. या तीनही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृतक चिमुकल्यांमध्ये दोघे मुलं हे सख्खे भाऊ होते. संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यांचे आई-वडील आणि घरातल्या इतर सदस्यांचा आक्रोश बघून गावकऱ्यांचे देखील डोळे पाणावले आहेत.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथे घडली आहे. चैतन्य अनिल माळी (वय 10 वर्ष), दत्ता अनिल माळी (वय 7 वर्ष), चैतन्य शाम बर्डे (वय 8 वर्षे) ही चिमुकले आज शेतात शेततळ्याजवळ खेळत होते. सध्या शाळा बंद असल्याने मुलं शेतात जातात. त्यानुसार ते आज शेतात गेले होते. शेतात शेततळ्यात ते खूप चांगल्याप्रकारे खेळत होते. या दरम्यान ते शेततळ्यातलं पाणी पाहू लागले. या दरम्यान ते पाण्याजवळ गेले. त्यांचा पाण्यात तोल गेला आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

संपूर्ण गावात हळहळ

संबंधित घटनेनंतर त्यांचे आई-वडील आणि इतर कुटुंबिय चिमुकल्यांचा शोध घेऊ लागले. शेततळ्याजवळ आल्यावर तीनही चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना दिसले. यावेळी परिसरात मोठी खळबळ उडाली. मुलाच्या कुटुंबियांनी टाहो फोडत आक्रोश केला. संबंधित घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर संपूर्ण गाव घटनास्थळी दाखल झालं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने तीनही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा असा दुर्देवी अंत झाल्याने पंचक्रोशित हळहळ व्यक्त केली जातेय.

गणपती विसर्जनाला गालबोट; मुंबईत 5 मुले बुडाली

राज्यात गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवाचा उत्साह होता. रविवारी अनंत चतुर्थीने या सणाची सांगता झाली. भक्तांनी दहा दिवस भक्तीभावाने बाप्पाची सेवा केली. त्यानंतर रविवारी बाप्पाचे विसर्जन केले. पण राज्यातील काही ठिकाणी विसर्जनादरम्यान काही अनपेक्षित आणि दुखद घटना घडल्या आहेत. सगळीकडे भक्तिमय वातावरण असताना राज्यात काही ठिकाणी या विसर्जनाला गालबोट लागले. मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनारी रात्रीच्या सुमारास 5 मुले बुडाली. त्यातील दोन मुलांना वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून, उर्वरित तीन मुलांचा शोध सुरु होता.

पुण्यात दोन मुले बुडाली, अमरावतीत एकाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातही गणपती विसर्जनादरम्यान दोन मुले बुडाली. मोशी आळंदी रोडवर इंद्रायणी नदी पात्रात गणपतींचे विसर्जन सुरू असताना दोन मुले बुडाल्याची घटना घडली. दत्ता ठोंबरे (20) आणि प्रज्वल काळे (18) अशी या मुलांची नाव आहे. प्रज्वल काळे हा ठोंबरे यांचा नातेवाईक होता. गणपतीनिमित्त तो पुण्यात आला होता. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. बुडालेल्या मुलांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा शोध घेतला जात आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील 17 वर्षीय अरमान पठाण या मुलाचा बासलापूर तलावात बुडून मृत्यू झाला. पोहताना गाळात पाय फसल्याने तो बुडाला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात काका आणि इतर दोन भाऊही गाळात फसले होते. पण, गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्यांचे प्राण वाचवले. मात्र अरमानच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

धक्कादायकः दोस्ताची थट्टा दोस्ताच्या जीवावर…ढकलेला मित्र जागेवर गतप्राण…नाशिकमधली चटका लावणारी घटना

जैसे ज्याचे कर्म तैसे.., चोरीसाठी दोन साथीदारांना घेऊन इमारतीवर चढला, चौथ्या मजल्यावर तोल गेला आणि….