आई गळफास घेऊन पंख्याला लटकली, चिमुकले रडत बंगल्याबाहेर आले, जळगावातील मन हेलावणारी घटना

| Updated on: Aug 26, 2021 | 4:06 PM

भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका 28 वर्षीय विवाहितेने आज (26 ऑगस्ट) आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं. विशेष म्हणजे ज्यावेळी तिने आत्महत्या केली त्यावेळी तिचे दोन्ही लहान मुलं घरातच होते.

आई गळफास घेऊन पंख्याला लटकली, चिमुकले रडत बंगल्याबाहेर आले, जळगावातील मन हेलावणारी घटना
suicide
Follow us on

जळगाव : भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका 28 वर्षीय विवाहितेने आज (26 ऑगस्ट) सकाळी आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं. विशेष म्हणजे ज्यावेळी तिने आत्महत्या केली त्यावेळी तिचे दोन्ही लहान मुलं घरातच होते. त्यांनी आपल्या आईला गंभीर अवस्थेत बघितलं. त्यानंतर मुलांनी टाहो फोडला. ते रडत घराबाहेर आले. महिलेच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अश्विनी किशोर चौधरी (वय 28) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, विवाहितेची मुले प्रणव (वय 3) आणि श्रेयस (वय 9) यांना उलट्यांचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रेयसची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

चिमुकल्यांना खाण्यातून विषबाधा?

अश्‍विनी चौधरी या विवाहितेने सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास राहत्या बंगल्यात पंख्याला साडीने गळफास घेतला. तिच्या लहान मुलांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर ते रडतच बाहेर आल्यानंतर घटनेची उकल झाली. विवाहितेची मुले प्रणव आणि श्रेयस हे घराबाहेर येताच उलट्या करीत असल्याने त्यांना गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. या चिमुकल्यांना खाण्यातून विषबाधा झाली की त्यांना खाण्यातून काही विषारी द्रव पदार्थ देण्यात आला? या बाबीचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव

पोलीस पाटील रतीलाल चौधरी यांनी विवाहितेच्या पतीसह तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तिथे पडून असलेल्या काही औषधाच्या बाटल्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या. मृत अश्विनीचा मृतदेह शववाहिनीद्वारे विच्छेदनासाठी जळगाव येथे हलवण्यात आला.

महिलेच्या पतीची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली

दरम्यान, मृत अश्विनी यांचे पतीचे शिक्षण एमबीए झाले असून तो फायनान्स बँकेत नोकरीस होते. मात्र कोरोनात त्याची नोकरी गेल्याने तो घरीच होता. हल्ली तो शेती आणि दुग्ध व्यवसाय करीत होता. दरम्यान, विषबाधा झालेल्या श्रेयसची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर तीन मित्रांकडूनच गँगरेप, अश्लील व्हिडीओ बनवल्याचाही दावा

अखेर राज्य सरकार सीबीआयला आवश्यक कागदपत्रे देण्यास तयार, अनिल देशमुखांना धक्का बसणार?