तुकाराम मुंढेंचा मित्र अचानक आला अन् रडू लागला, कारण ऐकून मुंढे पण झाले थक्क
महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त आणि आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासोबत रात्रभर अभ्यास करणारा मित्र अचानक सकाळी येऊन ढसा-ढसा रडू लागला. कारण ऐकून तुकाराम मुंढे देखील झाले होते थक्क. नेमकं काय घडलेलं?

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त आणि आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत आहेत. 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तब्बल 25 बदल्या झालेल्या मुंढे यांनी सध्या राज्यातील अन्न भेसळ आणि नियमबाह्य व्यवसायांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही रंजक किस्सेही अनेकदा चर्चेत येतात.
8 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या खुल्या मुलाखतीत मुंढे यांनी त्यांच्या जुन्या मित्राशी संबंधित एक मजेशीर किस्सा सांगितला. हा किस्सा थेट बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या लग्नाशी जोडलेला आहे.
माधुरीच्या लग्नाची बातमी ऐकून मित्र रडला
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, 1998-99 च्या सुमारास ते यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होते. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी ते आणि त्यांचे मित्र पंकज रात्री उशिरापर्यंत एकत्र अभ्यास करायचे. पंकज सध्या कस्टम्स कमिश्नर म्हणून कार्यरत असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
एके दिवशी सकाळी सुमारे 10 वाजता पंकज अचानक मुंढेंकडे आले आणि अक्षरशः ढसाढसा रडू लागले. नेमकं काय झालं, हे सुरुवातीला त्यांनी सांगितलं नाही. काही वेळाने त्यांनी मुंढेंना विचारलं, ‘तू आज सकाळचा पेपर वाचलास का?’
यानंतर रडत रडत त्यांनी सांगितलं की, त्यांची क्रश असलेल्या माधुरी दीक्षितचं लग्न झालं आहे. मित्राची ही अवस्था पाहून तुकाराम मुंढे मात्र स्वतःचं हसू आवरू शकले नाहीत. या किस्स्यामुळे मुलाखतीतील वातावरणही काही काळ हलकंफुलकं झालं.
लग्नाआधीच पत्नीसमोर ठेवली होती स्पष्ट अट
तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाची कहाणीही सांगितली होती. आयएएस अधिकारी झाल्यानंतर नागपूर येथे पोस्टिंग असताना त्यांचं अरेंज मॅरेज झालं. मात्र, होणाऱ्या पत्नीशी पहिल्याच भेटीत त्यांनी आपल्या आयुष्याबद्दल आणि अपेक्षांबद्दल स्पष्ट भूमिका मांडली होती.
मुंढे यांनी सांगितलं की, त्यांनी होणाऱ्या पत्नीला स्पष्टपणे सांगितलं होतं की, त्यांच्या आयुष्यात लोकसेवेला सर्वाधिक महत्त्व असेल. मोठ्या गाड्या, ऐषआराम किंवा भौतिक सुखसुविधांची अपेक्षा असेल तर हे नातं पुढे नेणं योग्य ठरणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांच्या कामाला आणि लोकसेवेच्या ध्येयाला पत्नीने साथ देण्याची तयारी दाखवली, तरच पुढे जाण्याचा विचार करू, अशी त्यांची भूमिका होती.
