शिक्षण हे मोठं पुण्याचं कामं, आपण शिका व इतरांनाही शिकवा, कीर्तनातून सांगणारे गाडगेबाबा महाराष्ट्राचे आधुनिक संत कसे बनले?

कौटुंबिक परिस्थितीमुळं गाडगेबाबा यांना शालेय शिक्षण घेता आलं नाही. लहानपणी गुराख्याच्या हातातील काठी हीच त्यांची पेन्सिल होती. काळ्या आईच्या पाटीवर नांगराची लेखणी करुन ते रेघोट्या ओढत राहिले. गाडगेबाबांवर संत तुकाराम महाराजांचा (Saint Tukaram Maharaj) प्रभाव होता.

शिक्षण हे मोठं पुण्याचं कामं, आपण शिका व इतरांनाही शिकवा, कीर्तनातून सांगणारे गाडगेबाबा महाराष्ट्राचे आधुनिक संत कसे बनले?
संत गाडगेबाबा बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Feb 23, 2022 | 7:30 AM

मुंबई: गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा अभंग कानावर पडल्यावर महाराष्ट्रातल्या माणसाला आपसुकच संत गाडेगबाबा (Saint Gadge Baba) यांची आठवण येते. संत गाडगेबाबांनी शिक्षण, स्वच्छता, भूतदया, अंधश्रद्धेवर प्रहार या तत्त्वावर आयुष्यभर काम केलं. महाराष्ट्राला आधुनिकतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या संत गाडगेबाबा यांचा आज जयंती आहे. गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध होते. 1939 ला श्री सयाजीराव हायस्कूलचा कोनशिला समारंभ झाला होता. रात्री बाबांचे कीर्तन होतं. गाडगेबाबांनी त्या कीर्तनात मुलांना निरक्षर ठेवणं पाप आहे, त्यांना शिकवा, कर्ज काढून सण करुन नका. तीर्थक्षेत्री जाऊ नका, नशा करु नका. शिक्षणाच्या पवित्र कार्यात भाऊरावांची मदत करा, असा संदेश गाडगेबाबांनी दिला. यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांना लोकांनी शिक्षणाच्या कार्यासाठी मदत केली. संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्राला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा मंत्र दिला त्यांचं मूळ नाव डेबुजी झिंगरोजी जाणोरकर हे होय. संत गाडगेबाबांचं शिक्षण हे त्यांना आलेल्या अनुभवातून झालं. संत गाडगेबाबा 23 फेब्रुवारी 1876 रोजी जन्म झाला होता. कौटुंबिक परिस्थितीमुळं गाडगेबाबा यांना शालेय शिक्षण घेता आलं नाही. लहानपणी गुराख्याच्या हातातील काठी हीच त्यांची पेन्सिल होती. काळ्या आईच्या पाटीवर नांगराची लेखणी करुन ते रेघोट्या ओढत राहिले. गाडगेबाबांवर संत तुकाराम महाराजांचा (Saint Tukaram Maharaj) प्रभाव होता.

लोकांना समजणाऱ्या भाषेत कीर्तन

कर्ज काढून देवांची यात्रा करू नका. गाईबैलांची चिंता वाहत जा. मुलांना शिकविल्याविना राहू नका. देवाला नवस करून कोंबडी बकरी मारू नका. आईबापाची सेवा करा. कर्ज काढून सण साजरे करू नका, भुकेलेल्यांना अन द्या शिवाशिव पाळू नका. हुंडा देऊन, घेऊन लग्न करू नका दारू पिऊ नका, देवाचे भजन केल्याशिवाय राहू नका. शिवाशिव करु नका, हे सर्व सहजपणे लोकांना कळणाऱ्या शब्दांमध्ये गाडगेबाबा सांगत होते. कीर्तनात आर्तता व अंतःकरणात तळमळ आहे हे जाणवू लागताच बाबांची वाणी लोकांवर हुकुमत गाजवू लागली. कीर्तनात लोकांची गर्दी वाढली.

पंढरपूरला गेले पण देवळात पाय ठेवला नाही

संत गाडगेबाबा आषाढी आणि कार्तिकी वारीनिमित्तानं पंढरपूरला जात होते. मात्र, त्याकाळी विठ्ठल मंदिरातील भेदभावामुळं बाबा कधी देवळात गेले नाहीत. बाबांची किर्ती वाढत गेल्यानं गाडगेबाबा पंढरपूरला असले की त्यांनी मंदीर प्रवेश करावा, कीर्तन करावं, असा आग्रह स्पृश्य लोकही धरत पण गाडगेबाबा विठ्ठल मंदिरात गेले नाहीत. संत गाडगेबाबांनी कष्टानं, जनतेतून पैसे गोळा करुन पंढरपूरमध्ये अस्पृश्यांसाठी धर्मशाळा उभी केली. 1920 च्या दरम्यान त्याचं कामं पूर्ण झालं. बाबांनी पुढं आणखी धर्मशाळा उभारल्या.

गाडगेबाबांनी महाराष्ट्रातील पंढरपूर, माहूर, नाशिक आळंदी, विदर्भ, कोकण ते जबलपूर आणि रायपूर पर्यंत कीर्तनाचे कार्यक्रम केले. आंध्र प्रदेश, हैदराबाद येथे कीर्तनाचे कार्यक्रम केले. गाडगेबाबांच्या कीर्तनात व्यसनमुक्ती, दारुबंदी आणि अस्पृश्यता निवारणचा समावेश होता. गाडगेबाबांनी गायींच्या संरक्षणासाठी गोशाळा उभारल्या. गाडगेबाबांनी महाराष्ट्रात धर्मशाळांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागात काम सुरु केलं होतं. बाबांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर भर दिला होता तो महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या चळवळीला प्रेरक ठरला आहे.गाडगेबाबांनी स्वावलंबन आणि श्रम प्रतिष्ठेला महत्त्व दिलं.

शिक्षणासाठी कार्य

गाडगेबाबांनी शिक्षण प्रसारासाठी शाळा, वसतिगृहं, महाविद्यालय काढण्याचं काम केलं. तत्कालीन समाजाला अंधश्रद्धेपासून दूर करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं होतं. शिक्षणामुळे मानवाचा, समाजाची प्रगती होते. गाडगेबाबा म्हणायचे “मायबापहो तुम्हाला काहीतरी मिळालं पण तुमच्या मुलाबाळांच्या नशिबी तेही येणार नाही, शिक्षण हे मोठं पुण्याचं कामं आहे, आपण शिका व इतरांनाही शिकवा.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर अवघ्या 14 व्या दिवशी बाबांचं निधन

गाडगेबाबांच्या आयुष्यामध्ये महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, प्र.के, अत्रे, पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांचे घनिष्ठ संबंध होते. गाडगेबाबांनी पंढरपूरची धर्मशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वाधीन केली होती. तीर्थयात्रेच्या वेळी येणाऱ्या मागासवर्गीयांच्या राहण्याची व्यवस्था फक्त तिथं करावी एवढी एकच विनंती गाडगेबाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 ला झालं. बाबांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता. त्यांनतंर अवघ्या 14 दिवसात संत गाडगेबाबांचं निधन झालं.

इतर बातम्या:

‘मायमराठी’साठी भोर तालुका सरसावला; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून 2 हजार 750 महिलांचे राष्ट्रपतींना पत्र

शेतकरी उपाशी, कारखानदार तुपाशी, शेतकरीद्रोही सरकारविरोधात आंदोलन करणार, सदाभाऊ खोत FRP वरुन आक्रमक

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us