सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी आघाडीवर, अजितदादांचाही विक्रम मोडला; राहुरीत काय घडतंय?

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केवळ आघाडीच घेतली नाही, तर अजितदादांचा विक्रमही मोडीत काढला आहे.

सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी आघाडीवर, अजितदादांचाही विक्रम मोडला; राहुरीत काय घडतंय?
सुनेत्रा पवार
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 04, 2026 | 1:42 PM

महाराष्ट्र विधानसभेच्या दोन महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, बारामतीमध्ये एका नव्या इतिहासाची नोंद झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केवळ आघाडीच घेतली नाही, तर अजितदादांचा दशकांचा विक्रम मोडीत काढला आहे.

अजितदादांचा ‘तो’ विक्रम इतिहासजमा

बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव करताना १ लाख ६५ हजार मताधिक्यांचा टप्पा ओलांडला होता. हे राज्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे मताधिक्य मानले जात होते. मात्र, आजच्या मतमोजणीत सुनेत्रा पवार यांनी हा विक्रम मागे टाकला आहे.

१९ व्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार १,६८,५५५ मतांनी आघाडीवर आहेत. एका पोटनिवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून त्यांनी राज्यातील सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या उमेदवार म्हणून स्वत:चे नाव सुवर्णअक्षरात कोरले आहे. बारामतीकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर आणि प्रामुख्याने सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

राहुरीत काय घडतंय? अक्षय कर्डिले विजयाच्या मार्गावर

दुसरीकडे, राहुरी विधानसभा मतदारसंघातही सत्ताधारी महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी ही निवडणूक लढवली.

राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे यांनी अक्षय कर्डिले यांना आव्हान दिले होते. मात्र, सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आघाडी कायम आहे. ते ८६,२५३ मतांनी आघाडीवर आहेत, जी पुढील फेऱ्यांमध्ये अधिक विस्तारताना दिसत आहे. वडिलांचा वारसा आणि विकासकामांच्या जोरावर अक्षय कर्डिले विजयाच्या समीप पोहोचले आहेत.

बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर महायुतीने (भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस) आपला गड राखला असल्याचे दिसत आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी प्रस्थापित केलेला नवा रेकॉर्ड हा आगामी राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विरोधकांनी या दोन्ही ठिकाणी तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us