‘नरेंद्र मोदी, अमित शाह ही खेळणी, खुळखुळे आता…’, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 13, 2023 | 6:27 PM

"कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्याबद्दल तिथली जनता दंगली करत नाहीय. तर आनंद, उत्सव साजरा करत आहेत. यापासून दिल्लीतील राज्यकर्त्यांनी बोध घेतला पाहिजे. हुकूमशाही चालणार नाही. सामान्य जनता तुमची हुकूमशाही उलथवून टाकेल", असं संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी, अमित शाह ही खेळणी, खुळखुळे आता..., संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालाय. तर काँग्रेसला एकहाती सत्ता मिळताना दिसत आहे. काँग्रेसला मिळालेल्या या यशामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या गोटातही उत्साहाचं वातावरण आहे. ठाकरे गटाकडून भाजपच्या पराभवावर आनंद व्यक्त करण्यात आलाय. खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ही खेळणी, खुळखुळे आता निवडणूक जिंकण्यासाठी चालणार नाहीत, अशा खोचक शब्दांत टोला लगावला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

“नरेंद्र मोदी, अमित शाह ही खेळणी, खुळखुळे आता निवडणूक जिंकण्यासाठी चालणार नाहीत. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या दहशतीला न जुमानता काँग्रेस पक्ष तिथे उभा राहिला. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर ईडीची दहशत दाखवण्यात आली. शिवकुमार यांना तर तुरुंगात टाकण्यात आलं होतं. या सगळ्यांना न जुमानता कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे हुकूमशाहीचा पराभव केला आहे. त्यामुळे कर्नाटकची जनता कौतुकास पात्र आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

या निकालावर राज्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारलं असता फडणवीस यांचा राजकीय अभ्यास तोकडा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. “देवेंद्र फडणवीस यांचा गोंधळ मी समजू शकतो. ते ज्यांच्या संगतीला आहेत त्यांना राजकारण काही कळत नाही. ढेकणं संगे हिरा भंगला असं म्हणतात. तसा हा हिरा ढेकण्याच्या नादाला लागून भंगलाय”, असा टोला राऊतांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

“कर्नाटकमधला काँग्रेसचा विजय आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आपण केलेलं राजकारण, याचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार. 2024 साली केंद्रात भाजपची सत्ता नसेल ही मी आता याक्षणी देवेंद्र फडणवीस यांना पैजेवर सांगतो”, असं आव्हान संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

संजय राऊत आणखी काय-काय म्हणाले?

कर्नाटकच्या जनतेला शुभेच्छा द्यायल्या हव्यात. कर्नाटकच्या जनतेचंच कौतुक करायला हवं. सामान्य जनता ही हुकूमशाहांचा पराभव करु शकते हे कर्नाटकच्या जनतेने देशाला दाखवून दिलं. त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की, कर्नाटकची जनता अभिनंदास पात्र आहे. कारण सामान्य जनता पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ, अनेक राज्यातल्या फौजा तिथे साधनं घेऊन उभ्या होत्या,धमक्या, दडपशाही, धार्मिक उन्माद करण्यात आला. भाजपचा पराभव झाला तर दंगली उसळतील, असं गृहमंत्री म्हणाले होते. पण कर्नाटक शांत आहे. आनंद, जल्लोष साजरा करत आहे.

कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्याबद्दल तिथली जनता दंगली करत नाहीय. तर आनंद, उत्सव साजरा करत आहेत. यापासून दिल्लीतील राज्यकर्त्यांनी बोध घेतला पाहिजे. हुकूमशाही चालणार नाही. सामान्य जनता तुमची हुकूमशाही उलथवून टाकेल. काही मोजकी राज्य सोडली तर भाजपकडे कोणती राज्य आहेत?

पश्चिम बंगाल, बिहार, केरळ, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, तामिळनाडूमध्ये भाजप नाही, आता कर्नाटकही गेलं. भाजपकडे कोणतं राज्य आहे ते सांगा. गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अर्धवट लटकलेलं, याच्या आधारावर तुम्हाला दिल्लीतलं सरकार मिळवता येणार नाही. 2024 चा सत्तेचा दरवाजा हा कर्नाटकातून उघडलेला आहे.

हो दुसऱ्याच्या घरात मुले झाले तर आम्ही वाटतो ना पेढे. तुम्ही नाही का वाढत? दुसऱ्यांच्या घरात नाही. महाराष्ट्र एक आहे. मग तुम्ही कशाल कर्नाटकात गेला होता? आम्ही भाजपच्या पराभवाचे पेढे वाटतोय. तुम्ही आणि मुख्यमंत्री कशाला कर्नाटकात गेलात? आमच्या मराठी माणसाच्या पराभवासाठी तुम्ही कशाला गेलात? आम्हाला आनंद झालाय की सामान्य माणसाने हुकूमशाहाचा पराभव केला आहे.

बजरंगबली कर्नाटकाच्या जनतेच्या बाजूने उभा राहिला. सत्याच्या बाजून उभा राहिला , असं मी म्हणतो. बजरंग बलीलाच 140 आमदारांचं बळ मिळालं आणि ती विजयाची गदा राहुल गांधी यांच्या खांद्यावर आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती ही मराठी माणसाची सीमा भागात प्रतिनिधित्व करते. आम्ही तिथे शर्थ केली. फार थोड्या मतांनी आमचे उमेदवार हरले. भाजपचे नतभ्रष्ट तिथल्या मराठी माणासाचा पराभवासाठी गेले नसते तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे 3 आमदार बंगळुरुच्या विधानसभेत असते. याचं पाप आणि पातक मी फडणवीस यांच्यावर फोडतो.

जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. शिंदे म्हणजे मुख्यमंत्री गेले तिथे सर्वत्र भाजपचा दारुण पराभव झाला. ही तर श्रींची इच्छा होती.