
‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘तेजस्विनी खानोलकर’ हे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल अदितीने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. “मी सनई चौघडे मालिकेत तेजस्विनी खानोलकरची व्यक्तीरेखा साकारतेय. नाव जसं भारदस्त आहे, तशीच माझी व्यक्तीरेखा आहे. माझ्या सुदैवाने मला नेहमीच छान भारदस्त भूमिका मिळालेल्या आहेत. तेजस्विनीच्या मनात बऱ्याच वर्षांपासून अनेक गोष्टी आहेत. तिने खूप सहन केलं आहे, खूप काही भोगलं आहे, अनुभवलेलं आहे. बऱ्याच गोष्टींनी तिच्या मनावर परिणाम केला आहे. दिसायला जे जसं दिसतं ते तसं मुळात नसतं, तशीच माझी व्यक्तीरेखा आहे,” असं ती म्हणाली.
याविषयी अदितीने पुढे सांगितलं, “तेजस्विनी तिच्या कुटुंबासाठी जीव ओवाळून टाकणारी आहे, आपल्या मुलांवर अत्यंत प्रेम करणारी आहे. झी मराठी वर मी नायिकेची, खलनायिकेची भूमिका साकारली आहे, पण आता पहिल्यांदा आता आईची भूमिका करणार आहे. आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरु आहेत, बऱ्याच नाटकांचं वाचन चालू आहे, मी आता स्वतः आई असल्यामुळे मला सशक्त भूमिका हवी होती. तेजस्विनीची भूमिका अगदी तशीच आहे, जिचं स्वतःचं काही म्हणणं आहे, तिच्याभोवती बऱ्याच गोष्टी फिरत आहेत. खरं सांगायचं तर आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती. पण काही गोष्टी तुम्ही स्वीकारता, हल्ली टेलिव्हिजनमध्येही चांगले बदल घडून येत आहेत. म्हणून मी या सगळ्यांचा खोलवर विचार करून माझ्या तत्वांचा सांभाळ करत, ही भूमिका स्वीकारली.”
राजू सावंत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची मनापासून इच्छा होती, हेसुद्धा अदितीने मान्य केलं. यावेळी भूमिकेतील वेगळेपण सांगताना ती पुढे म्हणाली, “आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका कशी वेगळी आहे हे सांगायचे झाले तर ‘वादळवाट’ मधली रमा चौधरी, ‘लक्ष’ मधली सलोनी देशमुख ‘हम बने तुम बने’ मधली तुलीका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधली मालविका, आणि आता ‘सनई चौघडे’ मधली तेजस्विनी.. प्रत्येक भूमिकेचे काहीतरी कंगोरे असतात. प्रत्येक भूमिकेची काहीतरी खास वेगळेपण असतं, दिसण्यामध्ये वागण्यामध्ये वावरण्यामध्ये. मी अनेक मालिका केलेल्या आहेत, तर मी नक्की म्हणेन की लेखकापासून प्रत्येकानेच माझ्या भूमिकेतलं वेगळेपण जपलेलं आहे. आणि त्याच खास वेगळेपणासोबत प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी मी माझ्या परीने खूप प्रयत्न केलेला आहे.” ‘सनई चौघडे’ ही मालिका येत्या 16 मार्चपासून रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.