Jalgaon MLC Election: जळगावात महायुतीचे नंदकिशोर महाजन रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी; विरोधी उमेदवाराला फक्त इतकी मतं
जळगावात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. नंदकिशोर महाजन यांचा 582 मतांनी विजय झाला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे यांना अत्यंत अल्प मतं मिळाली आहेत.

विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत जळगावमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवत आपला गड कायम राखला आहे. प्रशासनाकडून या निकालाबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा 582 मतांनी विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे यांना फक्त 17 मतं मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 तर शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर रेश्मा काळे यांना फक्त 1 मत मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
महायुतीचा विजय
या निवडणुकीत एकूण 630 मतदार होते. त्यापैकी 14 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. निवडणुक्तीत पाच मतं अवैध ठरले तर 611 मतं वैध ठरले होतं. त्यापैकी 582 मतं नंदकिशोर महाजन यांना मिळाली आहेत. एकूण मतदानापैकी 97 टक्के मतं एकट्या महायुतीच्या उमेदवाराला मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीचे देखील 90 हून अधिक मतं ही महायुतीच्या नंदकिशोर महाजन यांना मिळाल्याची माहिती समोर येत आहे. नंदकिशोर यांना भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींचा मोठा पाठिंबा मिळाल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीपूर्वी महायुतीकडून संख्याबळावर विश्वास व्यक्त करण्यात आला होता. आता निकालानंतर तो दावा खरा ठरला आहे. नंदकिशोर महाजन यांच्या विजयानंतर जळगावात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
जळगावमध्ये शिंदे गटाने भाजपच्या उमेदवारीसाठी पूर्ण ताकदीनिशी काम केल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महायुतीने विजय मिळवला. तब्बल वीस वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना नंदकिशोर यांनी व्यक्त केली होती. नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात थेट लढत झाल्याने जळगावच्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून होतं. मतमोजणी केंद्र परिसरात सकाळपासूनच राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींची मोठी गर्दी पहायला मिळाली. दोन्ही गटाकडून विजयाचे दावे करण्यात आले होते. अखेर यात महायुतीने बाजी मारली आहे.
