Arijit Singh: आता ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ गाण्यावरून वाद; अरिजीत सिंगचा कॉन्सर्ट रद्द केल्यावरून राजकारण

ममता बॅनर्जी यांच्यासमोर अरिजीतने गायलं होतं 'रंग दे तू मोहे गेरुआ'; आता कॉन्सर्ट रद्द, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

Arijit Singh: आता रंग दे तू मोहे गेरुआ गाण्यावरून वाद; अरिजीत सिंगचा कॉन्सर्ट रद्द केल्यावरून राजकारण
'रंग दे तू मोहे गेरूआ' गाण्यावर वाद
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2022 | 8:26 AM

कोलकाता: प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरिजीत सिंगच्या लाईव्ह शोवरून नवा वाद निर्माण झाला आहे. अरिजीतचा कॉन्सर्ट कोलकातामध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र हा कॉन्सर्ट आता रद्द करण्यात आला आहे. ईको पार्कमध्ये होणारा हा कॉन्सर्ट राजकीय कारणांमुळे रद्द झाल्याचं म्हटलं जातंय. कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘रंग दे तू मोहे गेरूआ’ हे गाणं गायल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचं कळतंय. कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अरिजीतकडे ‘गेरूआ’ गाणं गाण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर अरिजीतने हे गाणं गायलंसुद्धा होतं. मात्र आता त्याचाच फटका बसल्याचं म्हटलं जातंय.

भाजप-टीएमसीमध्ये वाद

अरिजीत सिंगच्या कॉन्सर्टवरून आता भाजप आणि टीएमसी या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगाल युवा भाजप नेते इंद्रनील खान यांनी अरिजीतच्या शोवरून टीएमसी सरकारवर टीका केली. ‘इको पार्कमध्ये होणारा अरिजीत सिंगचा शो पश्चिम बंगाल सरकारच्या HIDCO संस्थेद्वारे का रद्द केला गेला? KIFF मध्ये त्याने रंग तू मोहे गेरूआ हे गाणं गायल्याचे हे परिणाम आहेत का’, असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे केला. इतकंच नव्हे तर त्यांनी टीएमसीवर असहिष्णुतेचाही आरोप केला आहे.

याशिवाय भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीसुद्धा अरिजीतच्या कॉन्सर्टबद्दल एक ट्विट केलंय. ‘KIFF मध्ये अरिजीतने रंग दे तू मोहे गेरुआ हे गाणं गायल्यामुळे त्याचं कॉन्सर्ट रद्द केलं गेलं’, असं त्यांनी लिहिलंय.

टीएमसीने दिलं उत्तर

या वादावर आणि भाजपकडून झालेल्या आरोपांवर टीएमसीकडूनही उत्तर देण्यात आलं. HIDCO चे अध्यक्ष फिरहाद हकीम यांनी भाजप नेत्यांच्या आरोपांना फेटाळले आहेत. ‘कॉन्सर्टच्या आयोजकांनी स्थानिक पोलिसांना याविषयी अधिकृतपणे माहिती दिली नव्हती. त्यांना फक्त तोंडी सांगण्यात आलं होतं. दुसरीकडे जी-20 संमेलनसुद्धा आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कॉन्सर्टची जागा बदलण्यास सांगितलं आहे. यामागे कोणतंच राजकारण नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

अरिजीतचा हा कॉन्सर्ट फेब्रुवारीमध्ये होणार होता. या संपूर्ण प्रकरणी अद्याप अरिजीतकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.