Shabana Azmi: बिल्किस बानो प्रकरणाबद्दल बोलताना शबाना आझमींना अश्रू अनावर; म्हणाल्या “मला लाज वाटते की..”

गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका केली. या निर्णयाविरोधात देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला गेला. इतकंच नव्हे तर दोषींची सुटका झाल्यानंतर त्यांचा भाजप नेत्यांकडून सत्कारदेखील करण्यात आला.

Shabana Azmi: बिल्किस बानो प्रकरणाबद्दल बोलताना शबाना आझमींना अश्रू अनावर; म्हणाल्या मला लाज वाटते की..
Shabana Azmi
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Sep 02, 2022 | 3:00 PM

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) या त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. बिल्किन बानो (Bilkis Bano) प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एका मुलाखतीदरम्यान याविषयी बोलताना शबाना आझमी म्हणाल्या की, “गुजरात सरकारच्या (Gujrat Government) या निर्णयामुळे मला केवळ धक्काच बसला नाही, तर खूप लाजही वाटत आहे.” इतकंच नाही तर हे बोलताना त्यांचे डोळे पाणावले. गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका केली. या निर्णयाविरोधात देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला गेला. इतकंच नव्हे तर दोषींची सुटका झाल्यानंतर त्यांचा भाजप नेत्यांकडून सत्कारदेखील करण्यात आला.

‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी म्हणाल्या, “बिल्किस बानो प्रकरणात जे काही घडलं त्याचा मला खूप धक्का बसला आहे. बिल्किस बानोवर झालेल्या अन्यायासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तरी आजही खंबीरपणे उभ्या असलेल्या बिल्किस बानो यांच्या धैर्याला मी सलाम करते. माझ्या मनात त्यांच्या साहसाबद्दल खूप आदर आहे. त्यांच्यासोबत जी घटना घडली, ज्या प्रकारचा अन्याय झाला, त्याविरोधात त्या आजही लढत आहेत. त्यांनी ही लढाई लढली आणि दोषींना शिक्षासुद्धा मिळाली. हे खूपच दुर्दैवी आहे की दोषींना शिक्षा मिळाल्यानंतर आता कुठे त्या आपलं आयुष्य नीट जगत होत्या आणि आता पुन्हा एकदा न्यायव्यवस्था एक मस्करी बनून राहिली आहे.”

“बिल्किस बानो यांच्यासोबत जे घडलं, त्याविरोधात आपण आवाज नाही उठवला पाहिजे का? आपल्या घराच्या छतावर चढून याविरोधात ओरडून बोललं नाही पाहिजे का? आजसुद्धा महिलांच्या सुरक्षेबद्दल बोललं जातं. देशातील महिला आजही असुरक्षिततेच्या भावनेत जगत आहेत. त्यांना दररोज बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत. अशा पद्धतीच्या निर्णयाने त्यांना देशात सुरक्षित वाटेल का”, असा सवाल शबाना आझमी यांनी उपस्थित केला.

“2002 मध्ये बिल्किस बानो यांच्या बाबतीत जे घडलं त्याची भीषणता लोकांना जाणवू शकत नाही. हे सर्व किती घातक आहे हे समाजाला समजत नाहीये. तुरुंगातून सुटल्यानंतर ज्या प्रकारे दोषींचं मिठाईने स्वागत करण्यात आलं आणि त्यांना हार घालण्यात आले, त्यामुळे आपण महिलांसाठी कोणत्या समाजाची निर्मिती करत आहोत याचा विचार करायला लावतो,” असं त्या पुढे म्हणाल्या.