‘मिर्झापूर’चा ‘गुड्डू भैय्या’ बनला बाबा; पत्नी रिचा चड्ढाने दिला मुलीला जन्म

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल हे आई-बाबा बनले आहेत. रिचाने 16 जुलै रोजी मुलीला जन्म दिला. या दोघांनी एकत्र स्टेंटमेंटमध्ये चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. त्यांच्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मिर्झापूरचा गुड्डू भैय्या बनला बाबा; पत्नी रिचा चड्ढाने दिला मुलीला जन्म
Richa Chadha, Ali Fazal
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 18, 2024 | 5:08 PM

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. 16 जुलै रोजी रिचाने मुलीला जन्म दिला. रिचा आणि अली यांनी एकत्र स्टेटमेंट शेअर करत मुलीच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांना दिली. फेब्रुवारी महिन्यात रिचाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. ’16 जुलै रोजी आमच्या कुटुंबात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. बाळाच्या जन्माने आमच्या कुटुंबीयांवर आनंदाचा वर्षाव झाला आहे. तुम्ही दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आम्ही सर्व शुभचिंतकांचे आभार मानतो’, अशा शब्दांत रिचा आणि अलीने भावना व्यक्त केल्या आहेत.

नुकतंच रिचाने सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणातील खास फोटोशूट पोस्ट केलं होतं. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं, ‘प्रकाशाच्या किरणाशिवाय इतकं निर्मळ प्रेम या जगामध्ये कोण आणू शकतं? अली फजल, या आयुष्यातील अविश्वसनीय प्रवासात माझा जोडीदार बनल्याबद्दल धन्यवाद. प्रकाशाचा योद्धा, करुणा, सहानुभूती आणि प्रेमाचा अंश आपण या जगात आणुयात.’ या पोस्टच्या अखेरीस रिचाने स्पष्ट केलं होतं की तिने कमेंट्स ऑफ केले आहेत. म्हणजेच तिच्या या पोस्टवर कोणीच कमेंट करू शकणार नाही. ‘ही सर्वांच प्रायव्हेट गोष्ट मी पोस्ट करत असल्याने कमेंट्स बंद केले आहेत’, असं तिने लिहिलं होतं.

‘फुकरे’ या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची पहिल्यांदा भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि नंतर हळूहळू प्रेमात झालं. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान रिचा आणि अलीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. रिचा आणि अली यांचा धर्म वेगळा असून लग्नाच्या वेळी काही समस्या निर्माण झाल्या का, याविषयी तिने एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं. “तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल जर ठाम राहिलात आणि तुमचे कुटुंबीय तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले तर बाकी कोणत्याच गोष्टींनी फरक पडत नाही. माझ्या मते माणूस हा सर्वांत आधी माणूस असतो. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता, तेव्हा त्यात कोणतेच फिल्टर्स नसतात. तुम्ही प्रेमात असता, तेव्हा प्रेम ही एकच भावना महत्त्वाची असते,” असं ती म्हणाली होती.