
Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात गेलेला स्पर्धक त्याच्या मर्जीने घराबाहेर पडू शकत नाही. जरी त्याला बाहेर पडायचं असेल तर त्याला निर्मात्यांना नुकसान भरपाई द्यावी लागते. कधीकधी ही किंमत शोच्या बक्षिसाच्या रकमेपेक्षाही अधिक असते. सध्या बिग बॉसचा एकोणिसावा सिझन सुरू असून यातील एका स्पर्धकाने स्वत:च्या मर्जीने माघार घेत घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियमांनुसार त्याला बिग बॉसला कोट्यवधी रुपये द्यावे लागले आहेत. हा स्पर्धक दुसरा-तिसरा कोणी नसून आवेज दरबार आहे. आवेज हा प्रसिद्ध संगीतकार ईस्माइल दरबार यांचा मुलगा आणि अभिनेत्री गौहर खानचा दीर आहे. ज्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये तो घराबाहेर पडला, त्याच एपिसोडमध्ये त्याची वहिनी गौहर त्याला प्रोत्साहन द्यायला शोमध्ये आली होती. अनेकांनी आवेजचं घराबाहेर जाणं चुकीचं आणि अमान्य असल्याचं म्हटलंय. जर आवेजला घराबाहेर काढायचं होतं तर गौहरला कशाला बोलावलं, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
आवेजच्या एलिमिनेशनबद्दल विविध चर्चा सुरू असतानाच एक मोठा खुलासा झाला. त्याला बिग बॉसमधून त्याच्या कुटुंबीयांनीच बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. कारण बिग बॉसमध्ये आवेजची एक्स गर्लफ्रेंड लवकरच प्रवेश करणार आहे. त्यामुळे नॅशनल टेलिव्हिजनवर या दोघांमध्ये काही वाद होऊ नये किंवा त्यामुळे आवेजला आणखी त्रास होऊ नये म्हणून त्यांनी त्यालाच बाहेर काढण्याचं ठरवलं. आवेजच्या खासगी आयुष्याचा फायदा घेतला जाऊ नये, यासाठी त्यांनी बिग बॉसच्या निर्मात्यांना भरपाई देऊ केली. ही भरपाईची रक्कम तब्बल दोन कोटी रुपये असल्याचं कळतंय.
‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉसचे निर्माते आवेज दरबारची एक्स गर्लफ्रेंड शुभी जोशीला वाइल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे घरात आणण्याचा विचार करत आहेत. अमाल मलिक आणि बसीर अली यांनी आवेजवर रिलेशनशिपबद्दलचे अनेक आरोप केले होते. त्यावरून शोमध्ये बराच ड्रामा झाला होता. बिग बॉसच्या घराबाहेर आवेज बऱ्याच मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला.