पाकिस्तानातून पुन्हा एका बांगलादेशाची निर्मिती? थेट पाकिस्तान संसदेत चर्चा

अल जजीराच्या रिपोर्टनुसार, बलुचिस्तानमध्ये विरोधात बोलणारे कार्यकर्ते आणि नागरिक बेपत्ता होत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे विद्रोह अधिक वाढत आहे.

पाकिस्तानातून पुन्हा एका बांगलादेशाची निर्मिती? थेट पाकिस्तान संसदेत चर्चा
pakistan mp
Jitendra Zavar | Updated on: Feb 21, 2025 | 1:31 PM

पाकिस्तानची फळणी होऊन 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली. त्यानंतर पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थिती शांत झाली नाही. देशात बंडाचे वारे सुरुच असतात. बलूचिस्तानमधील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. त्याबद्दल पाकिस्तान संसदेत चर्चा झाली. खासदार मौलाना फजल उर रहमान यांनी मोठे वक्तव्य केले. पाकिस्तानातून आणखी एका बांगलादेशची निर्मिती होवू शकते, असे मौलाना फजल यांनी म्हटले आहे. बलूचिस्तान प्रातांतील पाच ते सात जिल्हे स्वत:ला स्वतंत्र घोषित करु शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

…तर पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात

पाकिस्तानच्या संसदेत बोलताना फजल उर रहमान म्हणाले की, बलूचिस्तानमधील जिल्हे स्वतंत्र जाहीर करु शकतात. या जिल्ह्यांनी स्वत:ला स्वतंत्र घोषित केले आणि संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला मान्यता दिली तर पाकिस्तानचे आस्तित्व धोक्यात येणार आहे.

कुर्रम भागात हिंसाचार वाढत असताना फजल उर रहमान यांचे वक्तव्य आले आहे. या भागात दीर्घकाळापासून सिया अन् सुन्नी यांच्यात वाद सुरु आहे. नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या या संघर्षामुळे आतापर्यंत 150 जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या भागातील कबायली गट मशीगन आणि इतर अत्याधुनिक शस्त्रांनी लढत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानजवळ असलेला हा पहाडी भाग पूर्णपणे वेगळा झाला आहे.

का आहे बलूचिस्तानचा वाद

बलूचिस्तान पाकिस्तानमधील सर्वात मोठा भूभाग आहे. परंतु या भागात लोकसंख्या अंत्यत कमी आहे. केवळ दोन टक्के लोकसंख्या या भागाची आहे. हा प्रदेश अनेक वर्षांपासून फुटीरतावादी बंडखोरीशी झुंज देत आहे, कारण बलुच फुटीरतावादी गटांना त्यांच्या नैसर्गिक संसाधनांवर अधिक स्वायत्तता आणि नियंत्रण हवे आहे. या संघर्षामुळे या प्रांतात अनेक दशकांपासून हिंसाचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत.

अल जजीराच्या रिपोर्टनुसार, बलुचिस्तानमध्ये विरोधात बोलणारे कार्यकर्ते आणि नागरिक बेपत्ता होत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे विद्रोह अधिक वाढत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us