Pakistan crisis : देश संभाळता येत नाहीय, म्हणून पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची नवी खेळी

Pakistan News : नवाज शरीफ लंडनमध्ये आहेत. आगामी निवडणुकीआधी नवाज शरीफ पाकिस्तानात येण्याची शक्यता आहे. सध्या नवाज शरीफ यांचे लहान भाऊ शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.

Pakistan crisis : देश संभाळता येत नाहीय, म्हणून पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची नवी खेळी
shehbaz sharif nawaz sharif
Image Credit source: agency images
| Updated on: Jun 19, 2023 | 1:13 PM

लाहोर : कंगाल पाकिस्तान सध्या अनेक संकटांशी सामना करतोय. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, बेरोजगारी, आर्थिक संकटात पाकिस्तान होरपळून निघालाय. पाकिस्तानची खरी सत्ता ही आयएसआयच्या हातात असते, हे जगजाहीर आहे. ते जेव्हा ठरवतील तेव्हा पाकिस्तानात सत्तापरिवर्तन होत असते. आजपर्यंतच्या इतिहासात पाकिस्तानात कोणालाही सत्तेची पाच वर्ष पूर्ण करता आलेली नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना चौथ्यांदा पंतप्रधानपदाची ऑफर मिळाली आहे.

पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पीएमएल-एन या पक्षाच्या अध्यक्षपदी चार वर्षांसाठी निवड झाली. यावेळी बोलताना, त्यांनी नवाज शरीफ यांची आठवण काढली. शहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांना पाकिस्तान येण्याचे आवाहन केलं. त्यांना पंतप्रधान बनण्याची ऑफर दिली. जर नवाज शरीफ पाकिस्तानात आले, तर मी पंतप्रधानपद सोडून देईन, असं शहबाज शरीफ म्हणाले.

मरियम नवाजची निवड

पक्षाअंतर्गत झालेल्या निवडणुकांवेळी शहबाज शरीफ म्हणाले की, नवाज शरीफ चौथ्यांदा पंतप्रधान झाल्यास, देशाची प्रगती होवून देश अधिक समृद्ध होईल. पदाधिकाऱ्यांचा निवडणुका मागच्यावर्षी होणार होत्या. पण त्याची मुदत वाढवण्यात आली. आता झालेल्या निवडणुकांमध्ये नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

नवाज शरीफ आधुनिक पाकिस्तानचे निर्माते

शहबाज शरीफ म्हणाले की, नवाज शरीफ आधुनिक पाकिस्तानचे निर्माते होते. त्यांच्या कार्यकाळात ऊर्जा क्षेत्रात भरभराट झाली. रस्त्याचे जाळे उभारले, कृषि, उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर महत्वपूर्ण क्षेत्रांचा विकास केला.

देश वर्तमान समस्यातून लवकरच बाहेर येईल

पंतप्रधान म्हणाले की, “सरकारने देशाच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी आंतरराष्टीय मु्द्रा कोषच्या सर्व अटींची पूर्तता केली आहे”. त्यांनी याचीही आठवण करुन दिली की देश जेव्हा महागाईशी लढत होता तेव्हा, पीएमएल-एन ने आपले पार्टी फंड महागाईविरुध्द खर्च केले. सामान्यलोकांना कठिण आर्थिक परिस्थितीत सुध्दा दिलासा दिला. पगारात 35 टक्के तर पेंशनमध्ये 17 टक्के वाढ करण्यात आली, असं त्यांनी सांगितलं.