माणुसकीचा अंश असेल तर…; उद्धव ठाकरेंचं भाजप खासदारांना मोठं आवाहन, अचानक नेमकं काय घडलं?
uddhav thackeray News : उद्धव ठाकरे यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच 20 तारखेच्या आंदोलनात सहभागी होण्याचंही आवाहन केलं आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या 14 दिवसांपासून सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनात आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांची तब्येत ढासळू लागली आहे. आता या आंदोलनात उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. नीट परीक्षा फुटी प्रकरण आणि भारतातील शिक्षण व्यवस्थेविरोधात 20 जुलै देशव्यापी आंदोलन होणार असून त्याला पाठिंबा उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. तर मी वांगचूक यांच्याशी फोनवरून बोललो. मी त्यांना आंदोलन करू नका म्हटलं. कारण त्यांची देशाला गरज आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप खासदारांनाही मोठं आवाहन केलं. माणुसकीचा अंश असेल तर तुम्हीही आंदोलनात सहभागी व्हा, असं आवाहन ठाकरेंनी केलं.
उद्धव ठाकरे यांनी आज सोमवारी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘२० तारखेच्या मोर्चात सर्वांनी जावं, असं म्हणत नाही. या आंदोलनात मी जाईल की नाही, हे नंतर बघुयात. परंतु तुम्ही जिथे आहात, तिथून तरी आंदोलन केलं पाहिजे. देशात विविध भागात आंदोलन केल्याने रान पेटेल. तेव्हा सरकार गुडघे टेकेल. मला वाटलं तर मी दिल्लीत जाईल. अभिजीत दीपकेंची चळवळ कोणताही झेंडा हातात घेऊन चाललेली नाही. कारण त्यांचा प्रस्थापित राजकारण्यांवरील विश्वास उडालाय. पण आम्ही त्यांच्यासोबत आहोत’.
’20 जुलैच्या आंदोलनाला मला वाटल्यास मीही जाईन. राहुल गांधींनी जावं. भाजपच्या लोकांनी गेलं पाहिजे. देशातील कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी जावं. राम रक्षा आंदोलनात मी सर्वांनाच आवाहन केलं होतं. पक्षाच्या पलिकडे जाऊन मी हे आवाहन करत आहे. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून जावं. नाही तर तुम्ही जिथे आहात, तिथून पाठिंबा द्या. निदर्शने करा. सर्वांनीच या तरुणांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. संजय राऊत यांनी दीपकेंचा मोदींसोबतचा फोटो ट्विट केला. त्यावर दीपकेंनी भाष्य केलं. जो संभ्रम होता तो दूर झाला.संजय राऊतांच्या ट्विटने गोंधळ दूर झालाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘सोनम वांगचूक यांची गरज आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेची गरज आहे. त्यांनी उपोषण सोडावं. संसदेचं पावसाळी अधिवेशन २० तारखेला सुरू होत आहे. आमचे खासदार या विषयावर संसद दणाणून सोडतील. राहुल गांधींनाही विनंती करणार आहे. भाजपच्या लोकांनाही सांगतो, तुमच्यात माणुसकीचा अंश असेल तर तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
