आदित्य सरोवर, अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत लॉनची औरंगाबादेत चर्चा, सात-बारा शिवसेनेचा आहे का? भाजपचा सवाल

| Updated on: Jan 28, 2022 | 11:48 AM

लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रकल्पांकडे लक्ष द्यावे, म्हणून अशी नावं देण्यात आल्याचा अजब दावा पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे, मात्र सामान्य जनतेकडून अशा प्रकारे नेत्यांची हुजरेगिरी केल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

आदित्य सरोवर, अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत लॉनची औरंगाबादेत चर्चा, सात-बारा शिवसेनेचा आहे का? भाजपचा सवाल
औरंगाबादेत अशा प्रकारे नेत्यांची नावं विकासकामांना देण्यात आली आहेत.
Follow us on

औरंगाबादः प्रजासत्ताक दिनाचे मुहूर्त साधत महापालिकेने खाम नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत विविध विकासकामांचेही धडाक्यात उद्घाटन केले. मात्र या विकासकामांना (Development works) शिवसेना नेत्यांची नावं देण्यावरून औरंगाबादेत चांगलंच राजकारण पेटलं आहे. विशेष म्हणजे आदित्य सरोवराचे उद्घाटन खुद्द पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्तेच झाले. यासह चंद्रकांत योग लॉन, अंबादास (Ambadas Danve) फुलपाखरू उद्यान तर सुभाष ऑक्सिजन हब अशी नेत्यांची नावं या विकासकामांना देण्यात आली आहेत. भाजपने या प्रकारावर आक्षेप घेतलाय. शहराचा सात-बाराच शिवसेनेच्या नावावर आहे का, असा सवाल नेत्यांनी केला आहे. या प्रकाराबाबत केंद्र शासनाकडे तक्रार करण्याचा इशाराही भाजप आमदार अतुल सावे यांनी दिला आहे.

केंद्र सरकारकडे तक्रार करू- अतुल सावे

स्मार्ट सिटीने केंद्र सरकारचा निधी वापरून म्हणजेच जनतेच्या पैशांतून ही कामं केली आहेत. यात नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे अयोग्य असून या प्रकरणाची तक्रार केंद्र सरकारकडे लेखी स्वरुपात करू, अधिवेशनातदेखील हा मुद्दा उचलून धरू, असा इशारा आमदार अतुल सावे यांनी दिला आहे.

हुजरेगिरीविरोधात आंदोलन करणार- संजय केणेकर

दरम्यान, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी शहराचा सात-बारा शिवसेनेच्या नावावर आहे का असा सवाल केला आहे. महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी नगर परिषद या संस्थांचे यात योगदान आहे. शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेचाही हातभार आहे. मात्र या सर्वांना सोडून नेत्यांचीच नावं देण्यात आली आहे. महापालिकेच्या या हुजरेगिरीविरोधात भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला आहे.

कमाल करते हो पांडेयजी…

पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरणाऱ्या व्यक्तींची नावं प्रकल्पांना देण्याची प्रथा असते. हयात राजकारण्याचे नाव अपवादात्मक स्थितीत ठिकाणीच देण्यात आलेले आहे. मात्र महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी तर शिवसेना नेत्यांना खुश करण्यासाठी सर्वच प्रकल्पांना नेत्यांची नावं दिली आहे. त्यामुळे औरंगाबादेत सध्या ‘कमाल करते हो पांडेयजी’ या डायलॉगचीच चर्चा आहे. लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रकल्पांकडे लक्ष द्यावे, म्हणून अशी नावं देण्यात आल्याचा अजब दावा पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

विकासकामांवर नेत्यांचीच नावं

खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने भाजप आणि शिवसेनेच्या विविध नेत्यांची नावं देण्याचा प्रकार केला आहे. त्याची नावं पुढील प्रमाणे-
– सतीश चव्हाण यांच्या नावे सतीश नाना-नानी पार्क
– अंबादास दानवे यांच्या नावे अंबादास फुलपाखरू उद्यान
– आदित्य ठाकरे यांच्या नावे आदित्य सरोवर
– चंद्रकांत खैरे यांच्या नावे चंद्रकांत योगा लॉन्स
– अतुल सावे यांच्या नावे अतुल बाल उद्यान
– प्रदीप जैस्वाल यांच्या नावे- ओपन जिम
– डॉ. भागवत कराड यांच्या नावे- भागवत कमल तलाव
– सूर्यकुंडाला खासदार इम्तियाज जलील यांची नावं
– व्हॉलीबॉल मेदानाला आमदार शिरसाट यांचे नाव
– डॉ. रफिक झकेरिया यांचे नाव नदी प्रकाशयोजनेला देण्यात आले आहे.

इतर बातम्या-

महाराष्ट्र मद्यराष्ट्र होणार होतं, आम्ही होऊ दिलं नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला

VIDEO : जीपच्या बोनेटवर बसून नवराईची एंट्री, सिंड्रेला गाण्यावर वऱ्हाडींचा भांगडा, पाहा व्हायरल व्हिडिओ!