काश्मिरींमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ‘चाणक्य’ स्वतः रस्त्यावर

| Updated on: Aug 07, 2019 | 10:23 PM

स्वतः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (NSA Ajit Doval) हे काश्मिरींशी संवाद साधताना दिसून आले. अजित डोभाल यांनी शोपियानमध्ये स्थानिकांसोबत रस्त्यावर उभा राहून जेवण केलं आणि गप्पाही मारल्या.

काश्मिरींमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी चाणक्य स्वतः रस्त्यावर
Follow us on

श्रीनगर : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 काढल्यानंतर आता काश्मिरी जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम सुरु आहे. स्वतः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (NSA Ajit Doval) हे काश्मिरींशी संवाद साधताना दिसून आले. अजित डोभाल यांनी शोपियानमध्ये स्थानिकांसोबत रस्त्यावर उभा राहून जेवण केलं आणि गप्पाही मारल्या. यावेळा स्थानिकांनी अजित डोभाल (NSA Ajit Doval) यांच्यासोबत दिलखुलासपणे संवाद साधला.

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर घाटीत शांतता रहावी यासाठी स्वतः अजित डोभाल लक्ष ठेवून आहेत. स्थानिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. डीजीपी दिलबाग सिंग यांच्यासह अजित डोभाल यांनी स्थानिकांशी गप्पा मारत सुरक्षेचाही आढावा घेतला.

शोपियान जिल्ह्यात दहशतवादाचा सर्वाधिक प्रभाव मानला जातो. या भागात सतत हिंसाचार सुरु असतो. बुरहान वाणी प्रकरणही शोपियानमध्येच घडलं होतं. बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. पण कलम 370 हटवल्यापासून घाटीत तणावपूर्ण शांतता आहे. हजारोंच्या संख्येने सुरक्षाबल तैनात करण्यात आलं असून जमावबंदी लागू आहे.

स्थानिकांशी संवाद

अजित डोभाल यांनी स्थानिकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना पूर्ण सुरक्षेची हमी दिली. शेतीचा व्यवसाय कसा सुरु आहे याबाबतही विचारणा केली. सध्या बाजारात मागणी चांगली असल्यामुळे सफरचंदाचा व्यवसाय चांगला सुरु असल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

इथे सर्व काही चांगलं होईल.. तुमची सुरक्षा करणं हेच आमचं काम आहे.. इथे कशा पद्धतीने शांती निर्माण होईल.. तुमची मुलं चांगल्या शाळेत जातील, जगाच्या तुलनेत पुढे जातील.. धर्मासाठी.. देशासाठी संरक्षण करतील आणि एक चांगली व्यक्तीही होतील, असं अजित डोभाल स्थानिकांशी गप्पा मारताना म्हणाले.

पाहा भेटीचा व्हिडीओ :