मुंबई : अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर हे सध्या बॉलिवूडमधील नवे लव्ह बर्ड्स आहेत. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातं. याबाबत आलिया किंवा रणबीरने कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नसले तरी, अनेकदा या दोघांना सोबत वेळ घालवताना पाहिले गेले आहे. एवढेच नाही तर आलियाने यावेळी न्यू इयरचं सेलिब्रेशनही रणबीरसोबत केलं. त्यामुळे हे दोघे जिथे जातात त्यांना याच विषयी विचारलं जातं आणि ते प्रत्येकवेळी टाळाटाळ करतात. मात्र, आता आलियाने तिच्या आणि रणबीरच्या नात्याबाबत मौन सोडलं आहे.
आलिया भट आणि अभिनेता रणवीर सिंहचा ‘गल्ली बॉय’ हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे सध्या हे दोघेही आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हे दोघे जेव्हा कुठे प्रमोशनसाठी जातात तेव्हा रणवीरला सर्व त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा देतात आणि आलियाला ती लग्न कधी करणार हे विचारतात. तिला तिच्या आणि रणबीरच्या नात्याबाबत विचारलं जातं आणि अखेर तिने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
‘गल्ली बॉय’च्या प्रमोशन दरम्यान आलियाला तिच्या लग्नाबाबत विचारण्यात आले. तेव्हा त्यावर उत्तर देत ती म्हणाली, ‘गेल्या वर्षी अत्यंत सुंदर असे लग्नसोहळे पार पडले. आता मला वाटतं की आम्हाला चिल करायला हवं. सिनेमे बघायला हवे. सिनेमांत काम करायला हवं. बाकी सर्व मग बघू.’
आलिया सध्या तिच्या आगामी सिनेमा ‘गल्ली बॉय’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसेच ती अभिनेता वरुण धवनसोबत ‘कलंक’ सिनेमाची शूटिंगही करते आहे. त्यासोबतच ती रणबीर कपूरसोबतच्या ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमाच्या तयारीत आहे, या सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चनही प्रमुख भूमिकेत असणार आहेत.