71 वर्षीय आजीबाईंची तब्बल 50 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनावर मात, ‘घाटी’ रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
औरंगाबादमध्ये एका 71 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी तब्बल 50 दिवस कोरोनाशी लढा दिला. या 50 दिवसांतील 25 दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आजींना कोरोनातून सुखरुप बाहेर काढलं आहे.
औरंगाबाद: राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होतेय. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. अशावेळी औरंगाबादमध्ये एका 71 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या आजींनी तब्बल ५० दिवस कोरोनाशी झुंज दिली आहे. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात या आजींवर उपचार सुरु होते. रुग्णालयातील 50 दिवसांपैकी 25 दिवस या आजी व्हेंटिलेटरवर होत्या. अखेर प्रचंड इच्छाशक्ती आणि डॉक्टरांची प्रयत्नांची पराकाष्ठा या जोरावर आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. (Aurangabad’s GHATI Hospital, 71-year-old grandmother beat Corona)
गयाबाई पवार या 71 वर्षीय आजीबाईंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आजींची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना 25 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर अजून 25 दिवस घाटीमध्ये उपचार करण्यात आले. या 50 दिवसांत घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करुन आजींना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. गयाबाई पवार यांनी 50 दिवस कोरोनाशी झुंज देत मृत्यूवर विजय मिळवला आहे. अखेर कोरोनामुक्त होऊन या आजी घरी परतल्या आहेत. एखाद्या कोरोना रुग्णावर तब्बल 50 दिवस उपचार केले जाण्याची ही भारतातील पहिलीच घटना असल्याचा दावा घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केला आहे.
राज्यात आता कोरोना चाचणी 980 रुपयांत!
राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दरांमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आहे. प्रति तपासणी 200 रुपये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरांनुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत. 4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतकेकमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट?
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे युरोपातील देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तर भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 80 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी 73 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहे. भारतामधील 1 लाख 50 हजार 456 जणांनी जीव गमावला आहे. सध्या देशात 6 लाख 10 हजार 803 अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी नवी दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढ आहे. दिल्लीत 5 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 5673 कोरोना रुग्ण दिल्लीत वाढले आहेत.
संबंधित बातम्या:
Corona Vaccine | कोरोना लस आल्यावर आरोग्य कर्मचार्यांना प्राधान्य देणार : राजेश टोपे
कोरोना लस येताच प्रत्येक भारतीयापर्यंत जलद गतीने पोहोचवण्याची तयारी : नरेंद्र मोदी
Aurangabad’s GHATI Hospital, 71-year-old grandmother beat Corona