“दार उघड उद्धवा, दार उघड!”, तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारावर भाजप आध्यात्मिक आघाडीचा बेमुदत ठिय्या

| Updated on: Nov 05, 2020 | 12:19 PM

राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. राज्यातील ठाकरे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

दार उघड उद्धवा, दार उघड!, तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारावर भाजप आध्यात्मिक आघाडीचा बेमुदत ठिय्या
Follow us on

तुळजापूर: राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीनं पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीच्या आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं. मंदिराच्या मुख्य दरवाजावर तुळजाभवानीच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. त्यानंतर या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. (BJP’s agitation in Tuljapur demanding start of temples in the state)

‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलं आहे. साधू-संतांचा आवाज ऐकायला हे सरकार तयार नाही. साधू-संतांशी चर्चा करा म्हणून दोन वेळा पत्र पाठवली. पण हे सरकार झोपी गेल्याचं सोंग आणत आहे’, अशी टीका तुषार भोसले यांनी केली. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटीलही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

राज्यात आजपासून सिनेमागृह, जलतरण तलाव आदींना परवानगी देण्यात आली आहे. तर हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार यापूर्वीच सुरु झाले आहेत. अशावेळी राज्यातील मंदिरं बंद का? असा सवाल भाजप, विविध मंदिर समित्या आणि राज्यभरातील साधू-महंतांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपनं राज्यभर थाळीनाद आंदोलन केलं होतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजून मंदिरं सुरु करण्याची भाजपची मागणी मान्य केलेली नाही.

मंदिरांचे टाळे तोडण्याचा इशारा!

28 ऑक्टोबरला भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मंदिरं सुरु करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांच्यासोबत जैन, बौद्ध, शिख, महानुभाव, इस्कॉन, सन्यासी आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 1 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील मंदिरं सुरु करा, अन्यथा मंदिरांची टाळी तोडणार असा इशाराही तुषार भोसले यांनी दिला आहे.

मंदिरांवरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्री वाद

मंदिरं सुरु करण्याच्या मागणीवरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील पत्रप्रपंचही संपूर्ण राज्यानं पाहिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरं सुरु करण्याची मागणी केली होती. इतकच नाही तर त्या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हिंदुत्वाचीही आठवण करुन दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांच्या पत्राला खरमरीत उत्तर दिलं होतं. आमच्या हिंदुत्वाला तुमच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना जोरदार उत्तर दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्राबाबत तक्रारही केली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या पत्रावर जाहीर नाराजी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात काही शब्दांचा वापर टाळायला हवा होता, असं अमित शाह म्हणाले.

संबंधित बातम्या:

मंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन भाजप अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, राज्यपालांची भेट, मंदिरांचे टाळे तोडण्याचा इशारा

भाजप्रणित अध्यात्मिक आघाडीच्या इशाऱ्यानंतर ऐतिहासिक मंदिरांच्या सुरक्षेत वाढ

BJP’s agitation in Tuljapur demanding start of temples in the state