साहित्य संमेलनापूर्वीच सणसणीत वाद; नोव्हेंबरमध्येच घ्या, ठाले-पाटलांचे निमंत्रकांना खडे बोल!

| Updated on: Oct 24, 2021 | 6:31 PM

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखांवरून निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यात चांगलीच पत्रापत्री रंगली आहे. विशेष म्हणजे खोटे कारण देत संमेलन पुढे ढकलण्याला ठाले-पाटलांनी सणसणीत पत्र लिहून आक्षेप घेतला आहे.

साहित्य संमेलनापूर्वीच सणसणीत वाद; नोव्हेंबरमध्येच घ्या, ठाले-पाटलांचे निमंत्रकांना खडे बोल!
कौतिकराव ठाले-पाटील
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखांवरून निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यात चांगलीच पत्रापत्री रंगली आहे. विशेष म्हणजे खोटे कारण देत संमेलन पुढे ढकलण्याला ठाले-पाटलांनी सणसणीत पत्र लिहून आक्षेप घेतला आहे. त्यामुळे संमेलनाच्या तारखा अचानक का बदलल्या, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

नाशिकमध्ये होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. निमंत्रकांनी संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकरांच्या पत्नी मंगलाताईंच्या ऑपरेशनचे कारण देत संमेलन डिसेंबरमध्ये होणार असल्याचे साहित्य महामंडळाच्या परस्पर निश्चित केले होते. मात्र, चुकीचे कारण देत संमेलन पुढे ढकलण्याचा हा खोटेपणा ठाले-पाटील यांनी एक पत्र लिहून उघड केला. या पत्रात त्यांनी निमंत्रकांनाही खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे संमेलन कधी होणार, हा गुंता कायम आहे.

हे आहे वादाचे कारण…

नाशिकमध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 19 ते 21 नोव्हेंबरमध्ये होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, संमेलनाचे निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी मंगलाताईंच्या ऑपरेशनचे कारण देत संमेलन डिसेंबरमध्ये ढकलण्यात येत असल्याचे कौतिकराव ठाले-पाटील यांना 16 ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून कळवले. त्यात पत्रात जातेगावकर म्हणतात की, मंगलाताईंची नियोजित शस्त्रक्रिया येत्या आठवड्यात होणार आहे. त्यानंतर त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांनी नोव्हेंबरमधील 19 ते 21 या तारखांना संमेलनात सहभागी होण्यास असमर्थता दर्शवली आहे. हे संमेलन जर 3 ते 5 डिसेंबरमध्ये झाले, तर संमेलनात सक्रिय सहभागी होणार आहेत. यावर मार्गदर्शन करावे.

ठाले-पाटील यांचे हे आहे उत्तर…

जातेगावकरांच्या या पत्राला 22 ऑक्टोबर रोजी कौतिकराव-ठाले पाटील यांनी सणसणीत उत्तर पाठवून खडेबोल सुनावले आहेत. त्या पत्रात ठाले-पाटील म्हणतात की, आपण 21 ऑक्टोबर रोजी करंजकर आणि डॉ. शंकर बोऱ्हाडे यांच्यासह औरंगाबादला माझ्यासह महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी तारखा बदलण्याबाबत चर्चा केली. साहित्य महामंडळाने डिसेंबरच्या तारखांना मान्यता द्यावी, असा आग्रह धरला. त्यासाठी आपण मंगलाताईंच्या ऑपरेशनचे कारण पुढे केले. त्यासंबंधी मी मसापचे मिलिंद जोशी यांच्याशी तसेच थेट मंगलाताईंशीही बोललो. मात्र, त्यांनी नोव्हेंबरच्या तारखा योग्य असल्याचे सांगून त्यावेळी नाशिकला यायला कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर कोरोनामुळे पुढे-पुढे चाललेले हे संमेलन लवकर होणेच चांगले आहे. ते आणखी पुढे ढकलले तर काहीच सांगता येत नाही, असे मतही नोंदविले. त्यामुळे आता १९ ते २१ नोव्हेंबर या तारखांनाच संमेलन घ्यावे. शनिवार-रविवारी भुजबळसाहेबांबरोबर आपण तारखा जाहीर कराव्या. संमेलन अजिबातच पुढे ढकलण्याची गरज नाही.

मग तारखा कोणासाठी बदलल्या?

नोव्हेंबरमध्ये संमेलन घेण्यासाठी महामंडळ इच्छुक होते. नारळीकर यांचीही सहमती होती, तर मग आयोजकांनी तारखा कोणासाठी बदलल्या, याची चर्चा आता रंगत आहे. विशेष म्हणजे संमेलन पुढे ढकलायचे असेल, तर ठोस कारण सांगायचे. त्यात नारळीकरांच्या नावाचा उल्लेख करून खोटे बोलायची गरज का होती, असा प्रश्नही आता निर्माण होत आहे. विशेषतः या साऱ्या प्रकारावर पालकमंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद घेऊन मत व्यक्त करणार असल्याची शक्यता आहे. मग आता साहित्य संमेलन कधी होणार यावरही या पत्रकार परिषदेतच पडदा पडेल असे मानले जात आहे.

संमेलन स्थळालाही होतोय विरोध

साहित्य संमेलन पूर्वी नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मैदानात घेण्याचे ठरले होते. हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती आहे. मात्र, आता आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीत (मेट) ते होणार असल्याचे समजते. हे स्थळ शहरापासून दूर आहे. येथे पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित होईल, पण शहरातील सामान्य नागरिक तिथे खास संमेलनासाठी येतील का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जर रसिकांनी संमेलनाकडे पाठ फिरवली, तर पुस्तक विक्रीही कमी होईल. त्यामुळे शहरातच संमेलन भरवावे, असा सूर अनेक जण आळवत आहेत. याबाबत प्रकाशक आपली भूमिका अधिकृतपणे मांडण्याची शक्यता आहे.

इतर बातम्याः

भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला; आमदार कांदेंना दिले बळ!

कृषिपंप वीजबिलाच्या थकबाकीत आता 66 टक्के सूट; जळगाव परिमंडळात 82 हजार जणांना लाभ