वर्ध्यात सव्वा किलोमीटरपर्यंत सॅनिटरी पॅडची रांग, विश्वविक्रमाची तयारी!
वर्धा : मासिकपाळी म्हटलं तर आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. या दिवसांत मुलींना अनेक रुढी परंपरांना सामोरं जावं लागतं. याबाबत समाजामध्ये जनजागृती झालेली नाही. समाज प्रगत झाला असला, तरी याबाबतीत अजून प्रगत झाला नसल्याचे चित्र आहे. मासिकपाळीवर साधं बोलणंही बऱ्याचदा टाळलं जाते. हाच समज-गैरसमज दूर करण्यासाठी वर्ध्यातील सेलू येथील डॉक्टर अर्पिता जयस्वाल प्रयत्न करत आहेत. […]
वर्धा : मासिकपाळी म्हटलं तर आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. या दिवसांत मुलींना अनेक रुढी परंपरांना सामोरं जावं लागतं. याबाबत समाजामध्ये जनजागृती झालेली नाही. समाज प्रगत झाला असला, तरी याबाबतीत अजून प्रगत झाला नसल्याचे चित्र आहे. मासिकपाळीवर साधं बोलणंही बऱ्याचदा टाळलं जाते. हाच समज-गैरसमज दूर करण्यासाठी वर्ध्यातील सेलू येथील डॉक्टर अर्पिता जयस्वाल प्रयत्न करत आहेत. समाजात जनजागृती व्हावी म्हणून डॉक्टर अर्पिता यांनी सव्वा किलोमीटर सॅनिटरी पॅडची रांग तयार करत एक नवा विक्रम साकारला आहे. यासाठी त्यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेशीही संपर्क साधला आहे.
वर्ध्यातील डॉक्टर अर्पिता जयस्वाल या ग्रामीण भागात मासिकपाळीच्या दिवसात स्वच्छता पाळली जावी यासाठी मागील एक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. मासिकपाळी दरम्यान डॉ अर्पिता महिलांना होणारा त्रास आणि स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड वापरण्याचा सल्ला देतात. मात्र महिला खर्च टाळण्यासाठी घरगुती कापडाचा उपयोग करतात. मात्र यातून होणाऱ्या चुकामुळे महिलांना गंभीर आजाराला समोरं जावं लागतं, असं अनेक सर्व्हेक्षणातून पुढे आलं आहे. यासाठी त्यांनी समाजात जनजगृती करण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे.
सॅनिटरी पॅड हा शब्दही उच्चारतान अनेकांना कुचंबणा होते. पण डॉक्टर अर्पिता यांनी चक्क 1.230 किमी सॅनिटरी पॅडची रांग तयार केली आहे. हा उपक्रम त्यांनी सेलू येथील शिवपार्वती मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये केला. यामध्ये तब्बल 15 हजार सॅनिटरी पॅडचा वापर करण्यात आला. हा विक्रम करुन त्यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड नोंदवणाऱ्या संस्थेला नोंद घेण्यासाठी विनंती केली.
यापूर्वीही बंगळुरु येथे 1 किमी लांब सॅनिटरी पॅडची रांग तयार करुन विशवविक्रम नोंदवण्यात आला होता. पण यापेक्षाही मोठी रांग तयार करत डॉ अर्पिता जयस्वाल यांनी नवा विक्रम करण्याचा उपक्रम केला. यावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमला थेट बोलावत खर्च करण्याचा पर्याय टाळला. यामुळे याचे चित्रीकरण पाठवून त्यावर नोंद करण्याची विनंती केली आहे. यासाठी संस्थेने 3 महिन्यात निर्णय घेऊन कळवणार असल्याचे सांगितले.
या सगळ्या प्रक्रियेत जवळपास 15 हजार सॅनिटरी पॅडचा उपयोग केला गेला. तसेच हे पॅड ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आणि महिलांना मोफत वाटणार आहेत. यातून जनजगृती होईल शिवाय महिला यावर बोलून आरोग्याच्या प्रश्नासाठी पुढे येतील. यातून एक नवा बदल होण्यास सुरुवात होईल, असं डॉ. अर्पिता जयस्वाल म्हणाल्या.