स्पेशल रिपोर्ट : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि कुणाकुणावर यंत्रणांची कारवाई?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर दादागिरीचे तर भाजपवर दडपशाहीचे आरोप विरोधक करत आहेत. संजय राऊतांनी विविध मुदद्यांवरुन अजित पवारांवर टीका केली. तर दुसरीकडे सदाभाऊ खोतांनीं ईडीवरुन केलेल्या विधानानंतर गेल्या दीड महिन्यांतील कारवायाही चर्चेत आल्या आहेत.
भावकी आणि दमदाटीवरुन बारामतीचं राजकारण सध्या गाजतंय. अजित पवार जाहीर सभांमधून निधीचं आमिष आणि दमदाटी करत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. तर आपण आपल्या समर्थकांना दम देत असू तर इतरांच्या पोटात दुखण्याचं कारण का? असा प्रश्न अजित पवारांनी केलाय. दुसरीकडे टाटांसारख्या मोठ्या आणि आदर्श उद्योजकांबद्दल अजित पवारांनी जे विधान केलं, ते वादात सापडलंय. उद्या जर मोदी सत्तेत असले आणि टाटानं नाही ऐकलं तर मोदींच्या एका फोननं टाटा सरळ होईल, असं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, आपण आपल्याच समर्थकांना दम देत असल्याचं अजित पवार म्हणत आहेत. मात्र गेल्याच महिन्यात त्यांनी विरोधकांच्याही समर्थकांना जाहीरपणे दम दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
माझ्याशिवाय दुसरं कुणीच काम करु शकत नसल्याचं अजित पवार म्हणत आहेत. मागणाऱ्याला आपण कोटी रुपयांचा निधी दिल्याचाही किस्सा सांगत आहेत. कचाकचा बटन दाबल्यास निधी देवू. वाढपी अर्थात अर्थमंत्री मीच आहे, असंही अजित पवार म्हणत आहेत. फडणवीस फाईल मंजुरीचं आश्वासन देत आपल्या स्वाक्षरीनंतरच तिजोरी उघडणार असल्याचं सांगत आहेत. बारामतीत अजितदादा यंदा तिजोरीची किल्ली तोडणार म्हणत ईडीचा वेग वाढवून इतरांना घाबरवा, असं आवाहन सदाभाऊ खोत फडणवीसांना करत आहेत. प्रश्न सुटले नाहीत तर मुली-बाळींची लग्नं होणार नाहीत, असं दत्ता भरणे म्हणत आहेत. गावात लीड भेटला नाही तर मला तोंड दाखवू नका असं म्हणणारे राम सातपुतेही चर्चेत आहेत.
विशेष म्हणजे अजित पवारांवर दमदाटीच्या आरोपांची सुरुवात त्यांच्याच मित्रपक्षाकडून झाली होती. आधी इंदापूरचे हर्षवर्धन पाटील. त्यानंतर पुरंदरच्या शिवतारे आघाडीवर होते. त्यानंतर शरद पवार गटाचे बाफनांनीही तोच आरोप केला. त्यामुळेच यंदा बारामती लोकसभेत भावकीच्या वादाबरोबरच दमदाटीच्याही चर्चा जोरात सुरु आहेत. दुसरीकडे मविआचे नेते भाजपकडून उमेदवार किंवा पाठिंबा देणाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय. त्यात सदाभाऊ खोतांचं ईडीचा स्पीड वाढवून समोरच्या आपल्यात घ्या. नाहीतर घाबरवून मारुन टाका, हे विधानही वादात सापडलंय.
राजकीय घडामोडी आणि कारवाई
27 मार्चला मुंबईतून ठाकरेंनी अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. त्याच दिवशी त्यांना कथित खिचडी घोटाळ्यात ईडीचं समन्स गेलं. 26 एप्रिलला म्हणजे परवाच पंढरपुरात शरद पवार गटाचे अभिजीत पाटील चेअरमन असलेला कारखाना शिखर बँकेनं सील केला. आज अभिजीत पाटील फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे. जयंत पाटलांच्या ट्विटनुसार लवकरच अभिजीत पाटलांचा भाजप प्रवेशही होणार आहे. 23 जानेवारीला सोलापुरातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहितेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. उपलब्ध माहितीनुसार 29 फेब्रुवारीला त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला. तेव्हापासून धवलसिंह राजकारणापासून दूर होते. आज फडणवीसांच्या माढा दौऱ्यात धवलसिंहांची फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती आहे.
धवलसिंहांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना पाठिंबाही जाहीर केलाय. 6 मार्चला रावेर लोकसभेत शरद पवार गटाच्या खडसेंविरोधातील 137 कोटींच्या दंडाच्या नोटीसला महसूल विभागानं स्थगिती दिली. एप्रिल महिन्यात आपण भाजपात घरवापसी करत असल्याचं सांगत खडसेंनी शरद पवारांची साथ सोडली. 10 एप्रिलला शरद पवार गटानं साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर केली. 26 एप्रिलला 14 वर्षांपूर्वीच्या एपीएमसीतील कथित एफएसआय घोटाळ्यात गुन्हा दाखल झालाय.
19 मार्चला काँग्रेसनं रामटेकमधून रश्मी बर्वेंना उमेदवारी दिली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या जातप्रमाणपत्रावर हरकत घेतली गेली. यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस दक्षता अहवाल, त्याच दिवशी कारणे दाखवा नोटीस आणि एका दिवसानंतर बर्वेंचं जातप्रमाणपत्र रद्द झालं. प्रशासनानं दाखवलेल्या या तत्परतेबद्दल कोर्टानंही आश्चर्य व्यक्त केलं. धुळ्यात यंदा भाजपच्या भामरेंविरोधात काँग्रेसचे कुणाल पाटील तगडे उमेदवार असल्याची चर्चा होती. मात्र यावेळी ते स्वतः इच्छूक नसल्याचं सांगितलं गेलं. गेल्या १ ऑक्टोबरला त्यांच्या सुतगिरणीवर आयकरचा छापा पडला होता. त्यामुळेच त्यांनी माघार घेतल्याची कुजबूज धुळ्यात आहे.