रेतीतस्करांचा कहर, गळा चिरत शेतकऱ्याला संपवले

| Updated on: Feb 18, 2020 | 7:23 AM

अवैध वाळू वाहतुकीत अडथळा ठरत असल्याने वाळू माफियाने शेतकऱ्याची हत्या केली (Illegal sand smugglers killed Farmer).

रेतीतस्करांचा कहर, गळा चिरत शेतकऱ्याला संपवले
Follow us on

नांदेड : अवैध वाळू वाहतुकीत अडथळा ठरत असल्याने वाळू माफियाने शेतकऱ्याची हत्या केली (Illegal sand smugglers killed Farmer). नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा या गावात दिवसाढवळ्या शेतकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे नदिशेजारी शेतजमीन असणाऱ्या नांदेडच्या शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे. रेतीमाफियांना पोलिसांसह महसूलच्या अधिकाऱ्याचे पाठबळ मिळत असल्याने त्यांची मजल आता थेट हत्या करण्यापर्यंत गेली आहे.

वाळू माफियांनी हत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव शिवाजी कदम (35) असं आहे. शिवाजी यांचे कयाधू नदीकाठी शेत आहे. याच नदीतून आरोपी त्र्यंबक चव्हाण आणि त्याचे साथीदार अवैधरित्या वाळू उपसा करत असतात. आज दुपारी मयत शिवाजी कदम यांनी शेतातील ऊसाला पाणी दिले. त्यामुळे रस्त्यावर चिखल झाला. चिखल झाल्याने वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर नदीत जाऊ शकले नाही. याच कारणातून आरोपी त्र्यंबक चव्हाण याने शिवाजी कदम यांच्यासोबत वाद घातला आणि धारदार शस्त्राने वार केले. यात शिवाजी कदम यांचा जागीच मृत्यू झाला.

शिवाजी यांची हत्या त्यांचे वडील कोंडीबा कदम यांच्या डोळ्यादेखत झाली. मुलाला वाचविण्यासाठी त्यांनी टाहो फोडला. मात्र बचावासाठी कुणीही पुढे आले नाही. त्यातून आरोपींनी शिवाजी कदमच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यात शिवाजी जागीच गतप्राण झाले. मृत शिवाजी हे शेतकरी संघटनेचे धाडसी कार्यकर्ता होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलनात सातत्याने सहभाग घेतला होता. आज त्यांची निर्घृण हत्या झाल्याने उंचाडा गावात तणावाची स्थिती आहे.

दरम्यान, कयाधू नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असताना पोलीस किंवा महसूल विभागाने कुठलीच कारवाई केलेली नाही. वेळेत वाळू माफियांवर कारवाई झाली असती तर कदाचित शेतकऱ्याचा बळी गेला नसता. या घटनेने उंचाडा गावात तणावाचे वातावरण आहे (Illegal sand smugglers killed Farmer).

मनाठा पोलिसांनी रेतीमाफियांना पाठीशी घातल्यानेच ही हत्या झाल्याचा आरोप होत आहे. सध्या रेतीला सोन्याचा भाव आल्याने नांदेड जिल्ह्यात सर्वत्रच रेतीची तस्करी सुरु आहे. त्यातून आता या रेतीमाफियांची हत्या करण्याइतपत मजल गेली आहे. रेतीच्या तस्करीमुळे जिल्ह्यातील कयाधू, पैनगंगा, आसना, मांजरा, गोदावरी आदी नद्यांच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण आहे. त्यातच पोलीस आणि महसूल प्रशासन या रेतीमाफियांना छुपा पाठिंबा देत असल्याने आज थेट हत्येची घटना घडली आहे.