ना धोतराच्या पायघड्या, ना मेंढ्यांचं रिंगण; ‘कोरोना’ने काटेवाडीकरांच्या उत्साहावर विरजण

संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे जाताना आकर्षणाची बाब असते ते म्हणजे काटेवाडीत होणारं मेंढ्यांचं रिंगण. मात्र यंदा कोरोनामुळे ते पाहायला मिळाले नाही

ना धोतराच्या पायघड्या, ना मेंढ्यांचं रिंगण; कोरोनाने काटेवाडीकरांच्या उत्साहावर विरजण
| Updated on: Jun 21, 2020 | 7:05 PM

बारामती : संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटपून भवानीनगरकडे निघाली, की वेध लागतात काटेवाडीत धोतरांच्या पायघड्यांनी होणारं स्वागत आणि विसाव्यानंतरच्या मेंढ्यांच्या रिंगणाचे. मात्र यावर्षी या सर्वांवरच पाणी फिरलं आहे. त्याचं कारण ठरला कोरोना! यावर्षी पालखीच निघाली नाही. त्यामुळे काटेवाडीतही सामसूमच पहायला मिळाली. (Katewadi Pilgrims wont witness Mendhyanche Ringan this year during  Ashadhi Waari)

संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे जाताना आकर्षणाची बाब असते ते म्हणजे काटेवाडीत होणारं मेंढ्यांचं रिंगण. सकाळी पालखी आल्यानंतर काटेवाडीत विसावते. तत्पूर्वी काटेवाडीतल्या परीट समाजाकडून धोतरांच्या पायघड्या घालून होणारं स्वागतही अविस्मरणीय असतं. विसावा उरकून पुढे निघताना मेंढ्यांचं रिंगण पार पडतं. वर्षानुवर्षे चालणारी ही परंपरा यावर्षी कोरोनामुळे खंडीत झाली आहे. त्यामुळे काटेवाडीकरांच्या उत्साहावरही पाणी फिरलं. मात्र पुढच्या वर्षी अधिक जोमानं रिंगण पार पाडू, असा विश्वास इथल्या मेंढपाळ युवकाने व्यक्त केला आहे.

काटेवाडीत पालखी दाखल झाल्यानंतर प्रवेशद्वारावरच परीट समाजातील बांधव धोतरांच्या पायघड्या घालत पालखीचं स्वागत करतात. एकामागून एक धोतर टाकत होणारं स्वागत अनेकांसाठी कुतुहुलाचा विषय असतो. कोरोनाचं संकट असल्यामुळे परीट समाजही या सेवेला मुकला.

एकूणच पालखी सोहळ्यावर ‘कोरोना’च्या संकटाने पाणी फिरवलं. सोबतीलाच वारीच्या मार्गात होणारे विविध उपक्रमही यावेळी खंडीत झाले. त्यामुळेच नेहमी जाणवणारा पालखी सोहळ्याचा उत्साह यावर्षी दुर्मिळ झाला.