तुझं-माझं करु नका, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्याला मदत करा : संभाजीराजे

| Updated on: Oct 19, 2020 | 4:42 PM

तुझं-माझं करु नका, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्याला मदत करा, असा सल्ला खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.

तुझं-माझं करु नका, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्याला मदत करा : संभाजीराजे
Follow us on

लातूर : तुफान पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी नेतेमंडळी ग्राऊंडवर उतरुन, शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत. खासदार संभाजीराजे यांनी लातूर जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. त्यानंतर तुझं-माझं करु नका, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्याला मदत करा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. (MP Sambhajiraje Visit latur over Farmer Collapsed Due To heavy Rain)

केंद्र आणि राज्य सरकारने तुझं-माझं न करता शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेऊन तातडीने मदत जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा, असं खासदार संभाजीराजे म्हणाले. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना लगोलग मदत द्यावी, असं ते म्हणाले.

“महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसंच राज्याच्या काही भागांत घरांचं तसंच शेतीचं मोठं नुकसान झालंय. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी या परिस्थितीत उभं राहायला हवं. त्यामुळे राज्य सरकारने तसंच केंद्र सरकारने तुझं माझं न करता तातडीने मदत द्यावी”, अशी अपेक्षा संभाजीराजेंनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीसांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दुपारपर्यंत हे दौंड-बारामती भागात होते. त्यानंतर भिगवण, इंदापूर, करमाळ्याचा त्यांनी दौरा केला. “सरकारने मदत द्यावी म्हणून सरकारवर दबाव निर्माण करु. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना ते मागण्या करायचे. आता त्यांना ईश्वराने मदतीसाठी शक्ती दिली आहे. त्यांनी तातडीने मदत करावी. तातडीने मदत करण्यासाठी काहीही लागत नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा सौलापूर दौरा

अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटीनंतर आणि पाहणी दौऱ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. सध्या आम्ही माहिती घेण्याचे काम करत आहोत. विविध भागांत नुकसानीचे पंचनामेही सुरु आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

(MP Sambhajiraje Visit latur over Farmer Collapsed Due To heavy Rain)

संबंधित बातम्या

नुकसान भरपाईचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; पंचनामे झाल्यानंतरच मदत मिळेल- मुख्यमंत्री

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला