‘अल्लाहू अकबर असो’, की ‘जय श्रीराम’; संसदेत घोषणा नको : प्रकाश आंबेडकर

अल्लाहू अकबर असेल किंवा जय श्रीराम असेल संसदेत कोणतीही घोषणा देऊ नये, असे मत वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

अल्लाहू अकबर असो, की जय श्रीराम; संसदेत घोषणा नको : प्रकाश आंबेडकर
| Updated on: Jun 25, 2019 | 11:50 AM

नवी दिल्ली : अल्लाहू अकबर असो की जय श्रीराम संसदेत कोणतीही घोषणा देऊ नये. संसदेत कोणत्याही धर्माच्या घोषणा नकोच, असे मत वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. सभागृह कोणतीही घोषणा न देता व्यवस्थित चालू शकते, संसदेचे पावित्र्य आपण जपले पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.

यावेळी आंबेडकरांनी मॉब लिंचिंगवरही भाष्य केले. मॉब लिंचिंगच्या घटना खास मुस्लिमांच्या विरोधात होत आहेत. त्यामुळे या अत्याचारांना अल्पसंख्यांकावरील न म्हणता मुस्लीमांवरील म्हणायला हवे. बुद्धीभेद करण्यासाठीच अल्पसंख्यांक हा शब्द वापरला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे सरकार जमावाकडून होणारी ही हिंसा रोखण्यास कमकुवत आहे. सरकारनेच मॉब लिंचिंग करण्याचे खुले परवाने दिल्याचाही आरोप आंबेडकरांनी केला.

आगामी विधानसभा निवडणुका वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्रित लढणार आहेत. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असुदोद्दीन ओवैसी यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय झाला.