कलम 370 वर नऊ मिनिटं, कोणत्या मुद्द्यावर पंतप्रधानांचं सर्वाधिक भाष्य?

| Updated on: Aug 15, 2019 | 11:27 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या मुद्द्यावर नऊ मिनिटं भाष्य केलं, तर भारताला पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याच्या उद्दिष्टाबाबत ते सर्वाधिक वेळ म्हणजे दहा मिनिटं बोलले

कलम 370 वर नऊ मिनिटं, कोणत्या मुद्द्यावर पंतप्रधानांचं सर्वाधिक भाष्य?
Follow us on

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर जनतेला संबोधित (PM Independence Day Speech) केलं. मोदींनी ‘मेरा देश बदल रहा है’ म्हणत गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील वाटचालीवरही भाष्य केलं. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या मुद्द्यावर ते नऊ मिनिटं बोलले. तर भारताला पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी सर्वाधिक वेळ भाष्य केलं. या विषयावर ते दहा मिनिटं बोलत होते.

देशवासियांमधील निराशेचं मळभ दूर झालं आहे. पुढील 5 वर्षात देशवासियांचं स्वप्न पूर्ण करु, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी यावेळी दिलं.

पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था

‘जर कठीण आव्हानं पेलली नाहीत, तर चालण्याची मजा काय?’ असं म्हणत पंतप्रधानांनी आपण भारताला पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न पाहिल्याचं सांगितलं. गेल्या पाच वर्षांत दोन ट्रिलियनवरुन तीन ट्रिलियनवर पोहचलो. येत्या पाच वर्षांत पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

जगाला भारतासोबत व्यापार करण्याची इच्छा आहे. आपण ही संधी दवडता कामा नये. आपण महागाई दर नियंत्रणात आणला आहे. विकास दर वाढत आहे. जीएसटी आणि आयटी पुनर्रचनेसारखी क्रांतिकारी पावलं उचलली आहेत.

देशातील प्रत्येक जिल्ह्यातून निर्यात झाली, तर पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यात कोणताही अडथळा येणार नाही, असंही मोदी म्हणाले. उद्योजकांनी अधिकाधिक रोजगार निर्माण करावा, गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

नरेंद्र मोदींच्या भाषणात कोणत्या मुद्द्यावर किती मिनिटं भाष्य

7 मिनिटं – भारतात गरजांची पूर्ती झाली, आता आकांक्षापूर्ती बाकी
3 मिनिटं – तिहेरी तलाक
9 मिनिटं – कलम 370
1 मिनिट – एक राष्ट्र एक निवडणूक
3 मिनिटं – गरिबी
6 मिनिटं – पेयजल
5 मिनिटं – लोकसंख्या नियंत्रण
2 मिनिटं – घराणेशाही आणि भष्ट्राचार
4 मिनिटं – सुशासन
5 मिनिटं – पायाभूत सुविधांचा विकास
10 मिनिटं – पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था
4 मिनिटं – शांती आणि सुरक्षा
2 मिनिटं – संरक्षण विभाग पुनर्रचना
2 मिनिटं – प्लास्टिकबंदी
2 मिनिटं – मेक इन इंडिया
1 मिनिट – डिजिटल व्यवहार
5 मिनिटं – पर्यटन
2 मिनिटं – खतं आणि रसायनांचं शेतीसाठी कमी वापर
1 मिनिट – चांद्रयान आणि क्रीडापटू

लोकसंख्यावाढीचं संकट

सध्या आपल्या देशाची वाटचाल ज्या स्थितीतून जात आहे, त्या स्थितीत राजकीय फायदे-तोटे पाहून निर्णय घेतले जाऊ नयेत. लोकसंख्येचा विस्फोट होत आहे. या विस्फोटामुळे आपल्या येणाऱ्या पिढीसमोर नवी संकटं उभी होत आहेत. देशात एक जागरुक वर्ग आहे, तो याबाबतची चिंता जाणून आहे. एक छोटा वर्ग आहे जो ही समस्या समजत आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मापूर्वीच ते त्याच्या भविष्याचा विचार करतात. आपल्यालाही त्यांच्याप्रमाणे विचार करायला हवा. आपल्या घरात बाळाला जन्म देण्यापूर्वी त्याच्या गरजांची पूर्तता करु शकेल की नाही याचा विचार करा, असं आवाहन मोदींनी केलं.

सरदार पटेलांची स्वप्नपूर्ती

कलम 370 रद्द करुन सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण केले. सगळ्या पक्षांनी 370 कलम रद्द करण्याबाबत पाठिंबा दिला. काही पक्षांनी यावर राजकारण केले. इतकी वर्षे तुमच्या हातात सत्ता होती मग तुम्ही 370 कलम रद्द का केले नाही? असा सवालही नरेंद्र मोदींनी विचारला.

दोन मिनिटांमुळे नरेंद्र मोदी स्वतःचाच विक्रम मोडण्यापासून वंचित

जम्मू काश्मीर, लडाखचा विकास करणार, तिथल्या नागरिकांचा विकास करणार, त्यांच्यावर 70 वर्ष अन्याय झाला, जम्मू काश्मीरचा सामान्य नागरिकही आता दिल्ली सरकारला विचारु शकेल, अशी हमी मोदींनी दिली.

तिहेरी तलाक हद्दपार

तिहेरी तलाकवरुन मुस्लिम महिलांमध्ये भीती निर्माण झाली होती. सगळ्या मुस्लिम देशांनी तिहेरी तलाकवर बंदी घातली. आम्ही पण सती बंदी, हुंडाबंदी निर्णय घेतले होते, मग मुस्लिम भगिनींसाठी तिहेरी तलाकबंदीचा निर्णय घ्यावा लागला, असं मोदी म्हणाले.

Independence Day LIVE | वाढती लोकसंख्या हे देशासमोरील मोठं आव्हान 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जनतेला एक तास 32 मिनिटं म्हणजेच 92 मिनिटं संबोधित केलं. 2016 मध्ये मोदींनी त्यापेक्षा दोन मिनिटांनी जास्त म्हणजे 94 मिनिटं भाषण केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणांचा कालावधी

स्वातंत्र्यदिन, 15 ऑगस्ट 2014 – 65 मिनिटं
स्वातंत्र्यदिन, 15 ऑगस्ट 2015 – 88 मिनिटं
स्वातंत्र्यदिन, 15 ऑगस्ट 2016 – 94 मिनिटं
स्वातंत्र्यदिन, 15 ऑगस्ट 2017 – 57 मिनिटं
स्वातंत्र्यदिन, 15 ऑगस्ट 2018 – 80 मिनिटं
स्वातंत्र्यदिन, 15 ऑगस्ट 2019 – 92 मिनिटं