पंतप्रधानांची तिसऱ्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स, 3 मेनंतरच्या रणनीतीविषयी चर्चेची शक्यता

| Updated on: Apr 23, 2020 | 7:49 AM

प्रत्येक राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्र सरकार लॉकडाऊन आणखी वाढवायचा की नाही, याबाबत पंतप्रधान निर्णय घेण्याची चिन्ह आहेत. (PM Modi Video Conference with Chief Ministers Second Phase of Lockdown)

पंतप्रधानांची तिसऱ्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स, 3 मेनंतरच्या रणनीतीविषयी चर्चेची शक्यता
Follow us on

नवी दिल्ली : ‘कोरोना’ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच 27 एप्रिल रोजी आयोजित या बैठकीला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. 3 मे रोजी लॉकडाऊनची मुदत संपत असल्याने पुढील रणनीतीविषयी चर्चा होण्याचे संकेत आहेत. (PM Modi Video Conference with Chief Ministers Second Phase of Lockdown)

सुरुवातीला 25 मार्च ते 14 एप्रिल या 21 दिवसांच्या कालावधीसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. ‘कोरोना’चा संसर्ग वाढल्याने पंतप्रधानांनी लॉकडाऊनची मुदत आणखी 19 दिवसांनी वाढवली. या बैठकीत 3 मे रोजी संपणाऱ्या लॉकडाऊनच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय जाणून घेतील. प्रत्येक राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्र सरकार लॉकडाऊन आणखी वाढवायचा की नाही, याबाबत निर्णय घेण्याची चिन्ह आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत दोन वेळा सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत त्यांनी 11 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा आग्रह धरला होता. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणाही केली.

कोरोनाच्या संदर्भात सर्व मुख्यमंत्र्यांसह 20 मार्चला झालेल्या पहिल्या बैठकीनंतर 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.

भारतात कोरोना व्हायरसचे एकूण 20 हजार 471 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 15 हजार 859 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 3 हजार 959 जणांना उपचार करुन सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 652 जणांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्रात आता 5 हजार 649 कोरोना रुग्ण आहेत. राज्यात कालच्या दिवसात कोरोनाचे 431 रुग्ण वाढले. राज्यातील बळींचा आकडा 269 वर पोहोचला आहे. (PM Modi Video Conference with Chief Ministers Second Phase of Lockdown)