संविधान आणि आरक्षण वाचवायचे असेल तर एनडीएला मतदान करू नका; आंबेडकरांचं आवाहन
निवडणुकीनंतर सरकार कोणाचे येणार हे आता सांगता येणार नसले तरी तुमच्या मत परिवर्तनामुळे जे सत्तेवर येतील ते संविधानानुसार चालतील, अशी अपेक्षा असून सर्व आरक्षित वर्गाला सांगतो की संविधान तसेच आरक्षण वाचले पाहिजे. त्यामुळे एनडीएला मतदान करू नका, असं आवाहन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
पाटणा: संविधान आणि आरक्षण वाचवायचे असेल भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बिहारमध्ये मतदान करू नका, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकर यांनी बिहारमध्ये वंचितचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी बिहारमध्ये तळ ठोकला आहे. (prakash ambedkar start campaign in bihar assembly election)
प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे आवाहन केलं आहे. ते पाटणा येथे बोलत होते. केंद्रातील सरकार हे संविधान तसेच आरक्षण विरोधी असून त्यांनी वैदिक धर्माच्या प्रसाराला सुरुवात केली आहे. देशात हुकूमशाही आणण्याच्या प्रयत्नात ते असून अशा एनडीए सरकारला बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर येऊ देऊ नका, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.
बिहारमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. केंद्रात तसेच बिहारमध्ये एनडीएचे सरकार असून हे लोक आरक्षण तसेच संविधान संपवण्याच्या मार्गावर आहे. या सरकारने विद्यार्थी वर्गापासून वैदिक धर्माचा प्रसार सुरू केला आहे. संसदीय लोकशाहीच्या जागी हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असं सांगतानाच अशा प्रकारच्या हुकूमशाहीला आपल्या पूर्वजांनी विरोध केला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं आणि त्याला आपल्या पूर्वजांनी खंबीर साथ दिली होती. त्यामुळे या येऊ घातलेल्या नव्या व्यवस्थेला हाणून पाडण्यासाठी सज्ज राहा, असं आवाहनही त्यांनी केलं. (prakash ambedkar start campaign in bihar assembly election)
एक लढाई जिंकल्यावर नवीन व्यवस्थेला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा जुनी व्यवस्था यावी आणि आपली मुलं गुलाम व्हावीत असं तुम्हाला वाटतं का? तसं वाटत नसेल तर आपलं मन घट्टं करा आणि निर्णय घ्या. विशेषत: आंबेडकरवाद्यांनी मग तो चांभार असो वा वाल्मिकी असो, पासवान असो वा अन्य कोणीही, मनाचा पक्का निर्णय घ्या व एनडीएला आपण मत देणार नाही हे मनाशी ठरवून टाका, असंही ते म्हणाले. निवडणुकीनंतर सरकार कोणाचे येणार हे आता सांगता येणार नसले तरी तुमच्या मत परिवर्तनामुळे जे सत्तेवर येतील ते संविधानानुसार चालतील, अशी अपेक्षा असून सर्व आरक्षित वर्गाला सांगतो की संविधान तसेच आरक्षण वाचले पाहिजे. त्यामुळे एनडीएला मतदान करू नका, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
Bihar Assembly Elections 2020 | बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर, तीन टप्प्यांत निवडणूक
बिहारमध्ये कोरोना संपला का?; राऊतांचा भाजपला सवाल
(prakash ambedkar start campaign in bihar assembly election)