America-India : भारताच्या आक्रमक पवित्र्याने अमेरिका बॅकफूटवर, त्या प्रश्नावर टाळलं उत्तर
America-India : अलीकडेच अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर भारताने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आता आणखी एका प्रकरणात भारतासंबंधीच्या प्रश्नावर अमेरिकेने उत्तर देणं टाळलं आहे.
सध्या अमेरिकेचे सूर बदलले आहेत. भारताच्या अंतर्गत विषयात मतप्रदर्शन करणं अमेरिकेने बंद केलं आहे. भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे हे सर्व होतय. भारतात एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराचा व्हिसा रिन्यू न होण्यावरुन वाद झाला. त्यावर अमेरिकेने कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला. अमेरिकेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर टिप्पणी केली होती. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कठोर आक्षेप घेतला होता.
ऑस्ट्रेलियन पत्रकाराच्या व्हिसा प्रकरणात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उप प्रवक्ते वेदांत पटेल पत्रकार परिषदेत म्हणाले की, “भारत सरकार आपल्या व्हिसा धोरणांबद्दल बोलू शकते. ही अशी गोष्ट नाही, ज्यावर मी इथून मत व्यक्त करावं” ऑस्ट्रेलियन पत्रकार अवनी डायसच्या व्हिसा वरुन वाद झाला. त्यावर एका पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पटेल यांनी हे उत्तर दिलं.
अवनी डायसच काय म्हणणं होतं?
ऑस्ट्रेलियन पत्रकार अवनी डायसने आरोप केलेला की, “भारत सरकारने तिला लोकसभा निवडणूक 2024 कव्हर करण्याची परवानगी दिली नाही” त्यानंतर तिला देश सोडावा लागलेला. भारत सरकारने आपला व्हिसा वाढवला नाही, असा अवनी डायसचा आरोप होता. त्यानंतर तिला 20 एप्रिलला देश सोडावा लागला. त्यामुळे आपल्याला लोकसभा निवडणुकीच रिपोर्टिंग करता आलं नाही, असं तिचं म्हणणं होतं.
केजरीवालांच्या अटकेवर अमेरिकेने काय म्हटलेलं?
अवनीच्या याच वक्तव्यावरुन अमेरिकेला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केलीय. याआधी अमेरिकेने केजरीवालांच्या अटकेबद्दल वक्तव्य केलं होतं. केजरीवालांच्या अटकेवर म्हटलेलं की, “आमची या बातमीवर बारीक नजर आहे. आम्ही निष्पक्ष कायदेशीर प्रक्रियेला प्रोत्साहन देतो”
भारताने कोणाला बोलावून घेतलेलं?
अमेरिकेच्या टिप्पणीवर भारताने नाराजी व्यक्त केली होती. दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे कार्यवाहक मिशन उप-प्रमुख ग्लोरिया बर्बेना यांना बोलावून घेतलं. त्यांच्यासोबत 40 मिनिट चर्चा केली. देशातील काही घडामोडींवर अमेरिकेच्या टिप्पणीवर आम्ही आक्षेप नोंदवलाय असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.