लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, मात्र लोक बोलायला घाबरत आहेत : राजीव बजाज

| Updated on: Jun 04, 2020 | 5:17 PM

देशातील प्रसिद्ध उद्योगपती राजीव बजाज यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत आर्थिक स्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली (Rajiv Bajaj and Rahul Gandhi discussion on lockdown and Economy).

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, मात्र लोक बोलायला घाबरत आहेत : राजीव बजाज
Follow us on

नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध उद्योगपती राजीव बजाज यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत आर्थिक स्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली (Rajiv Bajaj and Rahul Gandhi discussion on lockdown and Economy). यावेळी त्यांनी भारताने अत्यंत कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली, यामुळे कोरोना तर आटोक्यात आला नाहीच, पण अर्थव्यवस्था देखील कोलमडल्याचं मत व्यक्त केलं. भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवताना पश्चिमेकडील देशांचं अनुकरण करत कठोर लॉकडाऊन लावला. मात्र, त्यामुळे कोरोनावरही नियंत्रण मिळवता आलं नाही आणि आर्थिक सकल उत्पन्नही घटलं, असं राजीव बजाज म्हणाले.

राहुल गांधी मागील काही काळापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताची आर्थिक स्थिती आणि त्यावरील उपाययोजना यावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलत आहेत. यावेळी त्यांनी बजाज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी चर्चा केली. यावेळी राजीव बजाज म्हणाले, “अनेक जबाबदार लोक जे घडतंय त्यावर बोलण्यास घाबरतात. अशास्थितीत आपल्याला सहिष्णू आणि संवेदनशील राहण्यासाठी भारतात काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आशिया खंडातील अनेक देश कोरोनाविरोधात चांगलं काम करत होते. असं असताना आपण त्यांचं अनुकरण करण्याऐवजी पश्चिमेकडील इटली, फ्रांस, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचं अनुकरण केलं. पूर्वेकडील आशियातील देशांकडे लक्षच दिलं नाही. ”

“आपण अनेक कमतरता असलेल्या कठोर लॉकडाऊनच्या अंमलबजावणीचा प्रयत्न केला. त्यामुळेच आपल्याला दोन्ही पातळीवर नुकसान सहन करावं लागलं. कठोर आणि त्रुटीपूर्ण लॉकडाऊनमुळेच आजही कोरोना व्हायरस अस्तित्वात असेल. म्हणजेच लॉकडाऊनमुळे व्हायरसचा मुद्दा सुटला नाही. मात्र, अर्थव्यवस्था निश्चित उद्ध्वस्त झाली. आपण संसर्गाऐवजी जीडीपीच्या विकासदरालाच भुईसपाट केलं,” असंही राजीव बजाज यांनी नमूद केलं.

राहुल गांधी यांनी राजीव बजाज यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोरोना संकटाचा सामना करताना सुरुवातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना शक्ती देण्याची गरज व्यक्त केली. तसेच केंद्राने यात मदतीची भूमिका करायला हवी होती, असंही नमूद केलं. या संकटात मजूर, गरीब, कष्टकरी, छोटे उद्योग आणि मोठे उद्योग अशा सर्वांनाच मदतीची गरज असल्याचंही ते म्हणाले.


या संकटातून कसं बाहेर येता येईल यावर बोलताना राजीव बजाज म्हणाले, “आपल्याला पुन्हा एकदा मागणी तयार करावी लागेल. लोकांचा मुड बदलेल यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. आपल्याला लोकांची मानसिक शक्ती वाढवण्याची गरज आहे. यासाठी काही ठोस उपाययोजना आतापर्यंत का करण्यात आल्या नाही हे मला कळत नाही. जगभरात विविध देशांनी आपल्या नागरिकांसाठी घोषणा केलेल्या आर्थिक पॅकेजपैकी दोन तृतीयांश भाग थेट लोकांच्या हातात गेला. मात्र, भारतातील पॅकेजपैकी केवळ 10 टक्के भाग लोकांच्या हातात गेला.”

राहुल गांधींशी बोलू नका असा मला मित्राचा सल्ला : राजीव बजाज

राहुल गांधी यांनी सध्याच्या स्थितीत असलेल्या भीतीच्या वातावरणावर विचारले असता राजीव बजाज म्हणाले, “मी माझ्या एका मित्राला राहुल गांधींसोबत चर्चा करणार आहे आणि त्यात काही विषयांवर चर्चा होणार आहे असं सांगितलं. तर त्याची पहिली प्रतिक्रिया असं करु नको अशी होती. मी त्याला विचारलं पण का? थर तो म्हणाला असं नको करु, नाहीतर तुला अडचणींचा सामना करावा लागेल. मी त्यांना सविस्तरपणे सांगितलं की आम्ही व्यापार, अर्थशास्त्र, लॉकडाऊ”न यावर बोलणार आहोत. या काळात काय करायला हवं, कसं पुढे जाता येईल, उद्योग, उत्पादन यावर चर्चा होईल. त्यांना मोटारसायकल आवडते आणि त्यामुळे आम्ही मोटारसायकलविषयी देखील बोलू. मात्र, आता यावरही चर्चा केली जाऊ शकत नाही का? मात्र, तरीही माझा मित्र त्याच्या मतावर ठाम राहिला आणि का उगाच धोका पत्करायचा असं म्हटला.”

हेही वाचा :

राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला दुसऱ्यांदा धक्का, गुजरातमध्ये दोन आमदारांचा राजीनामा

सामनातून आधी टीका आणि नंतर लोटांगण हे नेहमीचं झालं आहे : प्रवीण दरेकर

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रम नको, मात्र एक गोष्ट करा… : अजित पवार

Rajiv Bajaj and Rahul Gandhi discussion on lockdown and Economy