एसटी महामंडळात मेगाभरती, मराठा आरक्षणाचीही अंमलबजावणी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : राज्यात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी एसटी महामंडळात मेगा भरती करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या वतीने 4242 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. लवकरच यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी 560 पदे एसटी महामंडळामार्फत कंत्राटीपद्धतीने भरण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. यावर्षी दुष्काळग्रस्त […]

एसटी महामंडळात मेगाभरती, मराठा आरक्षणाचीही अंमलबजावणी
Follow us on

मुंबई : राज्यात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी एसटी महामंडळात मेगा भरती करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या वतीने 4242 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. लवकरच यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी 560 पदे एसटी महामंडळामार्फत कंत्राटीपद्धतीने भरण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

यावर्षी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या 15 जिल्ह्यांमधील युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यांना रोजगार मिळावा या हेतूने एसटी महामंडळाने दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांना चालक तथा वाहक पदाची संधी उपलब्ध करून देण्याचा, निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत  प्रवास पास देण्याचा निर्णयही एसटी महामंडळाने यापूर्वीच घेतला आहे, असं दिवाकर रावते यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत सांगितलं.

दुष्काळग्रस्त जिल्हे आणि रिक्त पदे

एसटी महामंडळाची ही भरती औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या पंधरा जिल्ह्यात होईल. यापैकी 11 जिल्ह्यात 4 हजार 242 पदांच्या जागा आहेत.

बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यात चालक तथा वाहक पदांच्या रिक्त जागा नाहीत. तरी या चार दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येऊन त्यांना ज्या जिल्ह्यांमध्ये जागा रिक्त आहेत तिथे नियुक्त्या दिल्या जातील. ज्यावेळी या चार जिल्ह्यात चालक तथा वाहक पदाच्या जागा रिक्त होतील तेव्हा या उमेदवारांना पुन्हा त्यांच्या जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

संबंधित जिल्ह्यात एकाच दिवशी चालक तथा वाहक पदाच्या परीक्षा घेतल्या जातील. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील युवक उर्वरित 11 ठिकाणी कुठेही एका ठिकाणी परीक्षेस उपस्थित राहू शकतील. या भरतीशिवाय उर्वरित जिल्ह्यांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया लवकरच राबविली जाईल, अशीही माहिती रावतेंनी दिली.

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी

या भरतीमध्ये इतर आरक्षणाबरोबर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मराठा समाजाला नुकतंच 16 टक्के आरक्षण राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे.

परीक्षा शुल्कात सवलत

ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना या पदांच्या परीक्षा शुल्कात 50 टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काम करण्याचा प्रकल्प

एसटी महामंडळाकडून उत्तीर्ण उमेदवारांना आणखी एक पर्याय दिला जाणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवावयाच्या शहर वाहतूक योजनेसाठी 15 हजार रुपयांच्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा पर्यायही स्वीकारता येईल, अशी माहिती रावते यांनी दिली.