मुंबई : सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना, राज्यात अपघाताच्या चार घटना घडल्या. या चार अपघातांमध्ये एका चिमुरडीसह सात जणांनी जीव गमावला. हे अपघात कोल्हापूर, नागपूर, सातारा आणि मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर झाले आहेत.
चिमुरडीने गमावला जीव!
आरटीओ कार्यालयासमोर दिवाळीच्या पणती आणि लायटिंगच्या माळा विकत सरकवास कुटुंबीय बसले होते. पण तेवढ्यात भरधाव वेगातली बोलेरो त्यांच्या अंगावर घुसली, अन् चिमुरड्या सुमैयाचा डोळ्यादेखतच मृत्यू झाला. तीनच दिवसांपूर्वी सुमैय्याचा मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाचं होर्डींग्ज काढायच्या आधीच सुमैय्या या जगातून निघून गेली होती.
बेदरकार वाहनचालकाने दोघांना चिरडले
बेदरकार गाडी चालकामुळे नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तहसिलात दोन शिक्षकांनी आपला जीव गमावला. 45 वर्षीय नागोराव बन्सिगे, 42 वर्षीय हेमंत लाडे आणि 44 वर्षीय दुर्गेश्वर चौधरी हे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. छिंदवाडा नागपूर मार्गावर सकाळी सहाच्या सुमारास नागपूरच्या दिशेने येणारी भरधाव बोलेरो पिकअप व्हॅनने या तिघांना जोरदार धडक दिली. त्यात नागोराव बन्सिगे आणि हेमंत लाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुर्गेश चौधरी हे जखमी झाले. हे सर्व शिरुनी विद्यालयात शिक्षक होते. वाहन चालक दिलीप वाघाडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
दुचाकींची धडक
वाई-सुरुर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तीन जण ठार झाले, तर अन्य तिघे जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. सुयोग वाडकर, सायली कळंबे आणि प्रसाद सोनावणे अशी मृतांची नावे असून, हे तिघेही 20 ते 24 वयोगटातील आहेत.
एक्स्प्रेस वेवर अपघात
मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर रात्री उशिरा कंटेनर आणि ट्रकच्या झालेल्या धडकेत अतुल कुमार धरमपाल यादव या 26 वर्षीय कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे लेनवर रसायनी हद्दीत घडला. ट्रकचे पंक्चर काढण्याचे काम सुरु असताना कंटेनर चालकाने ट्रकला जोरदार धडक दिली.