औरंगाबादमध्ये मुस्लीम तरुणांना जय श्री राम म्हणायला लावल्याचे दोन्ही आरोप खोटे?

| Updated on: Jul 23, 2019 | 5:05 PM

या तक्रारी खोट्या होत्या का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, याबाबत खुद्द औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनीच शंका उपस्थित केली आहे. मॉब लिंचिंगच्या तक्रारी खोट्या निघाल्या तर कडक कारवाई करु, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय. त्यामुळे औरंगाबादच्या मॉब लिंचिंग प्रकरणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

औरंगाबादमध्ये मुस्लीम तरुणांना जय श्री राम म्हणायला लावल्याचे दोन्ही आरोप खोटे?
Follow us on

औरंगाबाद : देशात सध्या जबरदस्तीने जय श्री राम म्हणायला लावल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. औरंगाबादमध्येही अशाच दोन घटना समोर आल्या. शहरात चार दिवसात दोन मॉब लिंचिंग घटना घडल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. यात मुस्लीम तरुणांना मारहाण करणे आणि जबरदस्तीने जय श्री राम म्हणायला लावणे अशा स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण या तक्रारी खोट्या होत्या का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, याबाबत खुद्द औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनीच शंका उपस्थित केली आहे. मॉब लिंचिंगच्या तक्रारी खोट्या निघाल्या तर कडक कारवाई करु, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय. त्यामुळे औरंगाबादच्या मॉब लिंचिंग प्रकरणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

इम्रान पटेल आणि अमेर शेख यांनी मॉब लिचिंगची तक्रार दिली होती. 19 जुलैच्या रात्री इम्रान पटेल या तरुणाला हडको कॉर्नर परिसरात काही हिंदू तरुणांनी अडवून मारहाण केल्याचा आरोप आहे. शिवाय आपल्याला जबरदस्तीने जय श्री राम म्हणायला लावलं, अशी तक्रार इम्रान पटेल याने बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. तर दुसरा तरुण अमेर शेख हा झोमॅटो या खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या कंपनीत काम करतो. 21 तारखेला रात्री अमेर पटेल हा ऑर्डर घेण्यासाठी हॉटेलकडे निघाला असता काही तरुणांनी त्याला अडवलं आणि जय श्री रामच्या घोषणा द्यायला लावल्या, असं त्याचं म्हणणं आहे. याबाबत अमेर शेख याने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

इम्रान पटेल आणि अमेर शेख हे दोन्ही तरुण आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत आहेत. पण औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना मात्र या घटनांवर शंका आहे. औरंगाबाद शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं की, शहरात अशा दोन घटना घडल्याची तक्रार आहे. मात्र या तक्रारी खोट्या निघाल्या तर फिर्यादींवर आम्ही कडक कारवाई करणार आहोत.

पोलीस आयुक्तांचा संशय का बळावला?

पोलीस आयुक्तांना या घटना खोट्या असाव्यात याबाबतचा संशय बळावला तो 21 जुलैच्या रात्री घडलेल्या घटनेवरून. 21 जुलैला झोमॅटो या कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने जय श्री राम म्हणायला लावल्याची तक्रार दिली. पोलिसांनी रातोरात आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी संबंधित तरुणाशी रस्त्यावर आमची बाचाबाची झाली, पण आम्ही त्याला जय श्री राम म्हणण्याची सक्ती केली नाही, अशी माहिती दिली. याला पुष्टी देणारा आणखी एक पुरावा पोलिसांच्या हाती लागला तो म्हणजे घटनेच्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज. 50 सेकंदाच्या या फुटेजमध्ये कुठेच जय श्री राम म्हणायला लावल्याचं स्पष्ट होत नव्हतं. इतक्या कमी वेळात ही घटना घडू शकत नाही, असा पोलिसांचा संशय आहे. पण असं असलं तरी पोलीस अजूनही कुठल्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे मॉब लिंचिंगच्या या घटना खोट्या असल्याचं पोलीस खाजगीत बोलतात. पण अधिकृत स्पष्टोक्ती द्यायला अद्याप कुणीही तयार नाही.

औरंगाबाद शहराची ओळख ही नेहमीच संवेदनशील शहर म्हणून आहे. धार्मिक दंगलीचा या शहराला मोठा इतिहास आहे. याच संवेदनशील शहरात आता मॉब लिंचिंगच्या घटना घडल्याचा आरोप होऊ लागलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण शहराला शांत ठेवायचं असेल तर नागरिकांनी अफवा पसरवणे, खोटे आरोप टाळणे आणि सद्सद्विवेक बुद्धीने वागणे गरजेचं असल्याचं नागरिक सांगतात.

औरंगाबाद शहरात घडलेल्या घटना या मॉब लिंचिंगचा प्रकार नसाव्यात असा आता पोलिसांना संशय आहे. या तक्रारी खोट्या निघाल्या तर पोलीस त्यांच्यावर कडक कारवाई करू असा इशारा देत आहेत. या तक्रारी खोट्या असतील किंवा खऱ्या, पण या घडवण्यामागे कुणीतरी मास्टरमाईंड असेल तर तोही शोधून काढणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असेल.