
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे यांना पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुबीयांची भेट घेत संवाद साधून त्यांना धीर दिला.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दौंड तालुक्यातील रावणगाव आणि खडकी या गावातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांची ही पाहणी केली.

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावातील नुकसानग्रस्त शेतीची ही पाहणी केली. येथील रस्ताही पूर्णपणे खचला आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाचेगाव ता.गेवराई येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पालघरमध्ये खासदार राजेंद्र गावित यांनी नुकसान झालेल्या धानाची पाहणी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर , चिंचोली, भोसे या भागातील पिकांच्या नुकसानाची पाहणी केली.

शाहूवाडी तालुक्यातील भातशेतीच्या झालेल्या नुकसानाची पाहणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वेताळ-बांबार्डे,ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतीचे जे नुकसान झाले आहे,याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले.